Vehicle Insurance News: देशातील रस्त्यांवर धावणाऱ्या ५० टक्क्यांहून अधिक वाहनांचा विमा नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानं (IRDAI) कंपन्यांना जनजागृती करण्याचे निर्देश दिले आहेत. वाहन चालवताना 'थर्ड पार्टी इन्शुरन्स' हा केवळ मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर सोपस्कार नसून, तो अपघाताच्या वेळी तुमच्यासाठी सर्वात मोठी ढाल ठरू शकतो. त्यामुळे सर्वाकडे विमा असणं आवश्यक आहे.
जेव्हा तुमच्या वाहनामुळे दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तिला दुखापत होते किंवा तिच्या मालमत्तेचं नुकसान होतं, तेव्हा त्या व्यक्तीला (थर्ड पार्टी) भरपाई देण्याची जबाबदारी या विम्याद्वारे विमा कंपनी स्वीकारते. यामध्ये पादचारी किंवा दुसऱ्या वाहनातील प्रवासी यांचा समावेश होतो. मात्र, लक्षात ठेवा की, थर्ड पार्टी विम्यात तुमच्या स्वतःच्या वाहनाच्या नुकसानीची भरपाई मिळत नाही.
विम्याचे महत्त्वाचे फायदे
१. आर्थिक कवच : अपघातामुळे उद्भवणारी प्रचंड मोठी देणी विमा कंपनी देते. त्यामुळे तुमची बचत सुरक्षित राहते. २. कायदेशीर मदत : कोर्टातील प्रक्रिया आणि कायदेशीर खर्चाचा भारही विमा कंपनी उचलते.
३. दीर्घकालीन पर्याय : आता ३ ते ५ वर्षांचे 'थर्ड पार्टी' कव्हर आहेत. ते वार्षिक नूतनीकरणाच्या कटकटीपासून मुक्ती देतात.
४. पूर, भूकंपात मोठी मदत : पूर, भूकंप, आग, दंगल, चोरी अशा प्रसंगी गाडीचं नुकसान झाल्यास विमा मदत करतो.
खर्चाच्या तुलनेत संरक्षण मोठं
अनेकदा खर्चाच्या भीतीनं विमा टाळला जातो, मात्र याचे प्रीमियम अत्यंत मर्यादित आणि सरकारनं निश्चित केलेले असतात.
दुचाकी : वार्षिक प्रीमियम साधारण ५०० ते ३,००० रुपयांच्या दरम्यान असतो.
चार चाकी : २,००० ते ८,००० रुपयांपर्यंत वार्षिक प्रीमियम असतो.
ईव्हीसाठी : थर्ड पार्टीसाठी १,७०० रुपयांपासून ७,००० पर्यंत प्रीमियम आहे.
हप्ता भरायचा की लाखोंची भरपाई?
एकीकडे विम्याचा काही हजार रुपयांचा हप्ता आहे, तर दुसरीकडे विमा नसल्यास अपघाताच्या वेळी न्यायालयाकडून ठरवण्यात येणारी लाखो-कोटी रुपयांची नुकसानभरपाई आहे. ही भरपाई तुमचा खिसा रिकामा करू शकते. त्यामुळे दोन्हीपैकी काय निवडायचं ते ठरवायला हवं.
रस्त्यावरील एक दुर्दैवी अपघात तुमचं आर्थिक आणि कायदेशीर आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. अशावेळी थर्ड पार्टी इन्शुरन्स हा तुमचा सर्वात विश्वासू सोबती ठरतो. अशावेळी आपल्यावर येणारे मोठे आर्थिक संकट दूर होण्यास मदत होते.
