East India Company: एकेकाळी भारतावर राज्य करणारी लंडनमधील 'ईस्ट इंडिया कंपनी' आज कर्जात बुडाली आहे. परिस्थिती इतकी बिकट झालीये की, ही कंपनी दुसऱ्यांदा दिवाळखोरीत निघाली. विशेष म्हणजे, सध्या या कंपनीची धुरा लंडनमध्ये राहणाऱ्या एका भारतीय व्यक्तीच्या हातात आहे. ही कंपनी कर्ज फेडण्यात आणि देणी देण्यात अपयशी ठरल्याची माहिती समोर आलीये.
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, यावेळी ही कंपनी वॉलेंटरी लिक्विडेशन प्रक्रियेत गेली असून तिच्यावर सुमारे १० लाख पाऊंड (सुमारे १२ कोटी रुपये) कर्ज आहे. मूळ ईस्ट इंडिया कंपनी १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर संपुष्टात आली होती. १८५८ मध्ये भारतावरील तिचं नियंत्रण ब्रिटीश राजवटीकडे सोपवण्यात आलं आणि १८७४ मध्ये ती औपचारिकपणे बरखास्त करण्यात आली.
उबर अॅपवरुन बूक करता येणार उडणारी टॅक्सी; ३२० किमीचा स्पीड, कोणत्या शहरापासून सुरुवात होणार?
संपत्ती अवघी ७४०० रुपये
लंडनमधील 'कंपनीज हाऊस'मध्ये दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, कंपनीवर एकूण १० लाख पाऊंडपेक्षा जास्त देणी आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कंपनीची एकूण मालमत्ता फक्त ६०.३९ पाऊंड (सुमारे ७४०० रुपये) इतकीच असल्याचं सांगण्यात आलंय.
कंपनीवर असलेली देणी
६,११,२७९ पाऊंड (७.५ कोटी रुपये): आपली मूळ कंपनी EIC ग्रुप (ब्रिटीश व्हर्जिन आयलंड) कडे.
१,६३,१०५ पाऊंड (२ कोटी रुपये): कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी.
१,९३,७८९ पाऊंड (२.४ कोटी रुपये): ब्रिटनच्या कर विभागाला.
भारतीयानं खरेदी केली होती कंपनी
ईस्ट इंडिया कंपनीचे २००५ मध्ये एका प्रकारे पुनरुज्जीवन झालं होतं. व्यावसायिक संजीव मेहता (Sanjiv Mehta) यांनी २००५ मध्ये ही आधुनिक ईस्ट इंडिया कंपनी खरेदी केली. त्यांनी भागधारकांच्या एका गटाकडून मूळ कंपनीचे 'कोट ऑफ आर्म्स', बोधचिन्ह आणि इतर मालमत्तेचे अधिकार मिळवले. २०१० मध्ये त्यांनी सुमारे १ कोटी पाऊंडची गुंतवणूक करून या कंपनीला एका 'लग्झरी लाइफस्टाइल ब्रँड' मध्ये रूपांतरित केलं, जो चहा, चॉकलेट, आशियाई खाद्यपदार्थ, दागिने, नाणी आणि घरगुती वस्तू विकत असे.
कोण आहेत संजीव मेहता?
संजीव मेहता यांचा जन्म गुजरातमधील एका जैन कुटुंबात झाला. १९८९ मध्ये ते ब्रिटनला गेले. त्यांनी मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजमधून शिक्षण घेतलं असून ते आयआयएम (IIM) अहमदाबादचे विद्यार्थी देखील राहिले आहेत.
२०१० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं लंडनच्या मेफेअरमध्ये आपले फ्लॅगशिप स्टोअर उघडलं, जे नंतर बॉन्ड स्ट्रीटला हलवण्यात आलं. त्यावेळी मेहता म्हणाले होते, "मी भारतीय आहे, त्यामुळे माझ्यासाठी ही मोठी बाब आहे. ज्या कंपनीनं भारतावर राज्य केलं होतं, ती कंपनी पुन्हा विकत घेणं हे महत्त्वाचं आहे." मात्र, आता हे स्टोअर रिकामं पडलं असून कंपनीची वेबसाइटही गायब झाली आहे.
चर्चेतील ‘द क्राउन’ नाणं
२०२३ मध्ये संजीव मेहता यांनी राणीच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त ३.६ किलोग्रॅम सोनं आणि ६,४२६ हिऱ्यांनी बनवलेलं 'द क्राउन' नावाचे एक भव्य नाणं लाँच केले होते. ज्या मूळ कंपनीनं एकेकाळी भारताला लुटलं होतं, तीच आधुनिक कंपनी आता इंग्रजांच्या कर्जात बुडाली आहे, ही एक मोठी विडंबना आहे.
