Home Loan EMI : घर खरेदी करणे हा आयुष्यातील सर्वात मोठा आणि भावनिक निर्णय असतो. अनेक जण यासाठी अनेक वर्षे बचत करतात, बँक कर्जाचे ईएमआय किती असेल याची आकडेमोड करतात. पण खरा प्रश्न हा आहे की, आपण आपल्या कमाईनुसार किती किमतीचे घर खरेदी करू शकतो? ५० लाख रुपयांचे की १ कोटीचे? या प्रश्नाचे उत्तर कोणताही ब्रोकर नाही, तर एक साधा आर्थिक नियम '५-२०-३-४०' देतो. हा नियम तुमच्या उत्पन्न, बजेट, ईएमआय आणि डाउन पेमेंटमध्ये योग्य संतुलन साधतो, ज्यामुळे घर घेण्याचे स्वप्न तुमच्यासाठी कधीही आर्थिक ओझे बनत नाही.
'५-२०-३-४०' नियम काय आहे?
हा नियम तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवून घर खरेदी करण्यास मदत करतो.
१. ५% नियम (किमान 'सेफ्टी फंड')
- घराच्या एकूण किमतीपैकी किमान ५% रक्कम तुमच्या स्वतःच्या निधीतून तयार ठेवावी.
- जर तुम्ही ५० लाख रुपये किमतीचे घर घेणार असाल, तर तुमच्याकडे कमीत कमी २.५ लाख रुपये इतका फंड असणे आवश्यक आहे. (बँक सहसा २०% डाउन पेमेंट मागते, पण ५% हा तुमचा मूलभूत सुरक्षा निधी आहे.)
२. २०% नियम (कर्जाची मर्यादा)
- तुम्ही घराच्या किमतीच्या ८०% पेक्षा जास्त कर्ज घेऊ नये.
- ५० लाख रुपयांच्या घरासाठी, तुम्ही ४० लाखांपेक्षा जास्त गृहकर्ज घेऊ नये. यामुळे तुमचा ईएमआय सहज भरला जातो आणि व्याजाचा मोठा भार तुमच्यावर पडत नाही.
३. ३ पट नियम (घराची किंमत विरुद्ध उत्पन्न)
- तुमच्या घराची किंमत तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या ३ पटीपेक्षा जास्त नसावी. हा नियम सर्वात महत्त्वाचा आहे.
- जर तुमचे वार्षिक उत्पन्न १५ लाख रुपये असेल, तर तुमच्यासाठी ४५ लाख रुपये किमतीपर्यंतचे घर योग्य मानले जाईल. ५० लाखांचे घरही बॉर्डरलाइनवर असेल, तर १ कोटी रुपयांचे घर तुमच्या क्षमतेपलीकडचे ठरू शकते.
४. ४०% नियम (EMI ची मर्यादा)
- तुमच्या ईएमआयची रक्कम तुमच्या मासिक पगाराच्या ४०% पेक्षा जास्त नसावी.
- जर तुमचे मासिक उत्पन्न १ लाख रुपये असेल, तर तुमचा ईएमआय जास्तीत जास्त ४०,००० रुपये पर्यंतच असावा. यामुळे तुमचे इतर घरखर्च, बचत आणि गुंतवणूक सुरक्षित राहतात.
वाचा - शेअर बाजारात पैशांचा पाऊस! टॉप १० पैकी ७ कंपन्यांना १.२८ लाख कोटींचा फायदा; सर्वाधिक कमाई कोणाची?
हा नियम का महत्त्वाचा आहे?
'५-२०-३-४०' हा नियम केवळ घर निवडण्यातच नव्हे, तर तुमचे संपूर्ण आर्थिक नियोजन स्थिर ठेवण्यास मदत करतो. यामुळे गृहकर्ज फेडताना तुमच्या जीवनशैलीवर, बचतीवर किंवा आपत्कालीन निधीवर कोणताही दबाव येत नाही आणि तुम्ही तणावमुक्त राहू शकता.
