शेअर बाजार कोसळला की, गुंतवणूकदारांनी पहिली चिंता असते की आपल्या पैशांचे काय? तो सुरक्षित तर आहे ना? हीच गोंधळाची स्थिती सध्या म्युच्युअल फंडांच्या बाबतीत दिसून येते. जानेवारी महिन्यात निफ्टी ३.१ टक्क्यांनी घसरला. निफ्टी मिडकॅपमध्ये ३.५३ टक्क्यांची घट झाली, तर निफ्टी स्मॉलकॅपमध्ये तब्बल ५.५२ टक्क्यांची घसरण झाली. फेब्रुवारीतही परिस्थिती सुधारलेली नाही. १३ फेब्रुवारीपर्यंत निफ्टी २५,५०३.२० च्या आसपास होता. या काळात माझा फंड योग्य आहे का? फंड बदलावा का? काही काळासाठी एसआयपी थांबवावी का? असे प्रश्न डोके वर काढतात. काही जण भावनेच्या आहारी जाऊन गुंतवणूक थांबवतात आणि तिथेच गणित बिघडते. या उलट शिस्तबद्ध गुंतवणूक करणारा फायद्यात राहतो. (हे अधिक चांगले समजून घेण्यासाठी तक्ता पाहा).
एसआयपी (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) ही पद्धत अस्थिर बाजारातच प्रभावी ठरते. कारण बाजार घसरला की त्याच रकमेवर जास्त युनिट्स मिळतात. सरासरी खरेदी किंमत (एव्हरेज कॉस्ट) कमी होते. दीर्घकालीन परतावा वाढतो.
एसआयपी थांबवल्यास दोन परिणाम होतात. पहिला म्हणजे, घसरणीत स्वस्त युनिट्सची संधी गमावली जाते आणि दुसरे म्हणजे कंपाउंडिंगमध्ये खंड पडतो. अगदी तात्पुरती खंडित झालेली एसआयपीही अंतिम फंड मूल्यावर दीर्घ परिणाम करते.
एसआयपीतील हा खंड दहा वर्षात ४ ते ५ लाखांपर्यंत नुकसान करू शकतो. मग तुम्हीच ठरवा तुम्ही कोणते गुंतवणूकदार आहात? शिस्तबद्ध की भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणारे?
बाजार घसरला तरी घाबरू नका
एसआयपी सुरू ठेवा फंडाची गुणवत्ता तपासा, भावनेवर निर्णय घेऊ नका दीर्घ उद्दिष्ट पाहा आवश्यक असल्यास मालमत्ता वाटप (अॅसेट अॅलोकेशन) तपासून घ्या.
संयम महत्त्वाचा बाजारातील अस्थिरता टाळता येत नाही. गुंतवणूकदार मात्र आपल्या वर्तनावर नियंत्रण ठेवू शकतो. एसआयपी सुरू ठेवू शकतो.
