Lumpsum Vs SIP :शेअर बाजारात सध्या जो वेगवान चढ-उतार पाहायला मिळत आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात एकच प्रश्न आहे, गुंतवणूक कशी करावी? हातात असलेली मोठी रक्कम एकदाच गुंतवावी की दरमहा थोडी थोडी रक्कम लावून जोखीम कमी करावी? या दोन्ही मार्गांचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत, पण सध्याच्या अस्थिर बाजारपेठेत त्यांचा परिणाम वेगळा दिसून येतो.
'एसआयपी' सुरक्षित का मानली जाते?
'सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन' म्हणजेच एसआयपी हा मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांचा आवडता पर्याय आहे. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 'रुपी कॉस्ट एव्हरेजिंग'. जेव्हा बाजार पडतो, तेव्हा तुम्हाला तितक्याच पैशात जास्त युनिट्स मिळतात आणि जेव्हा बाजार वधारतो, तेव्हा कमी युनिट्स मिळतात. यामुळे दीर्घकाळात तुमच्या खरेदीची सरासरी किंमत संतुलित होते. समजा तुम्हाला वर्षाला १ लाख २० हजार रुपये गुंतवायचे आहेत. जर तुम्ही दरमहा १०,००० रुपयांची एसआयपी केली आणि यादरम्यान बाजार १० टक्क्यांनी घसरला, तर तुम्हाला स्वस्त दरात जास्त युनिट्स मिळतील. वर्षाच्या अखेरीस बाजार सावरला की तुम्हाला सरासरी चांगला परतावा मिळतो.
एकरकमी गुंतवणूक कधी फायदेशीर?
जर बाजार आधीच मोठ्या प्रमाणात पडलेला असेल आणि तिथून पुढे तेजीची शक्यता असेल, तर एकरकमी गुंतवणूक 'गेम चेंजर' ठरू शकते. बाजार १५% घसरल्यानंतर जर तुम्ही मोठी रक्कम गुंतवली आणि त्यानंतर मार्केटमध्ये रिकव्हरी आली, तर तुम्हाला सुरुवातीपासूनच पूर्ण रकमेवर वाढीव परतावा मिळतो. एखाद्या गुंतवणूकदाराने मार्केट पडलेले असताना १ लाख रुपये एकदाच गुंतवले आणि पुढील १२ महिन्यांत बाजार २० टक्क्यांनी वधारला, तर त्याची गुंतवणूक थेट १.२ लाख रुपये होईल. अशा वेळी एसआयपीपेक्षा लमसम गुंतवणूक सरस ठरते.
अस्थिर बाजारात नक्की काय करावे?
अस्पष्ट दिशा : जर बाजाराची दिशा ठरलेली नसेल आणि चढ-उतार जास्त असतील, तर एसआयपी जोखीम विभागण्यासाठी सर्वोत्तम आहे.
मोठी घसरण : जर बाजार आपल्या उच्चांकी स्तरावरून १०-१५% खाली असेल आणि तिथून सावरण्याचे संकेत असतील, तर एकरकमी अधिक फायदा देऊ शकते.
