Air India-Indigo: हवाई प्रवास करणारे नागरिक आणि विमान कंपन्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशातील प्रमुख विमानतळांवर विमानांच्या लँडिंग आणि पार्किंग शुल्कात २५% कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा निर्णय पुढील तीन महिन्यांसाठी लागू राहणार असून, वाढत्या खर्चामुळे अडचणीत आलेल्या एअरलाईन्सना याचा मोठा फायदा होणार आहे.
हा निर्णय का घेण्यात आला?
Airports Economic Regulatory Authority of India (AERA) ने हा निर्णय देशातील प्रमुख एअरलाईन्सच्या मागणीनंतर घेतला आहे. विशेषतः IndiGo आणि Air India यांनी शुल्क कमी करण्याची विनंती केली होती.
सध्या भारतीय एअरलाईन्सवर दुहेरी दबाव आहे. इराणमधील संघर्षामुळे इंधन आणि ऑपरेशनल खर्च वाढला आहे, तर पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. यामुळे भारतीय विमानांना लांब मार्गाने प्रवास करावा लागत असून, खर्चात मोठी वाढ झाली आहे.
एअरलाईन्सच्या खर्चावर परिणाम
एअरलाईन्सच्या एकूण खर्चात इंधन आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनानंतर विमानतळ शुल्क हा तिसऱ्या क्रमांकाचा मोठा खर्च असतो. International Air Transport Association (IATA) च्या माहितीनुसार, लँडिंग आणि नेव्हिगेशन शुल्काचा एअरलाईन्सच्या बजेटवर मोठा परिणाम होतो. मात्र आता सरकारच्या या निर्णयाने कंपन्यांना आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. एअरलाईन्सचा खर्च कमी झाल्यास भविष्यात हवाई तिकिटांच्या दरात स्थिरता येऊ शकते आणि प्रवाशांवरील आर्थिक भार कमी होण्याची शक्यता आहे.
