मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मॉनेटरी पॉलिसी कमिटीची (MPC) महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी पार पडली. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या गृह आणि वाहन कर्जाचा मासिक हप्ता तूर्तास वाढणार नाही. यासोबतच लघु उद्योजक आणि सोन्या-चांदीच्या बाजारासाठी आरबीआयने मोठे बदल जाहीर केले आहेत.
आरबीआयने सलग सहाव्यांदा रेपो रेट ५.२५% वर स्थिर ठेवला आहे. महागाई नियंत्रणात येत असली तरी जागतिक अनिश्चितता लक्षात घेता आरबीआयने 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे. यामुळे बँकांकडून व्याजाचे दर वाढवले जाण्याची शक्यता कमी असून कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
MSME उद्योजकांना २० लाखांपर्यंत कर्ज
लघु, सूक्ष्म आणि मध्यम (MSME) उद्योगांना चालना देण्यासाठी आरबीआयने विनातारण (Collateral-free) कर्जाची मर्यादा १० लाखांवरून वाढवून आता २० लाख रुपये केली आहे. १ एप्रिल २०२६ पासून हा नवीन नियम लागू होईल, ज्यामुळे लहान व्यावसायिकांना खेळते भांडवल मिळवणे सोपे होणार आहे.
महागाईच्या चौकटीत आता 'सोने-चांदी'ची एन्ट्री
आरबीआयने एक ऐतिहासिक पाऊल उचलत महागाई मोजण्याच्या चौकटीत आता सोने आणि चांदीच्या किमतींचा समावेश केला आहे. यापूर्वी केवळ कांदा, टोमॅटो यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर लक्ष दिले जात असे. मात्र, जागतिक स्तरावर सोन्या-चांदीच्या किमतीत होणारी वाढ देशांतर्गत महागाईवर परिणाम करत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही महिन्यांत भू-राजकीय जोखीम, ऊर्जा बाजारपेठेतील अस्थिरता आणि हवामानातील बदल यामुळे महागाईला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा रिझर्व्ह बँकेने दिला आहे. २०२५-२६ च्या अखेरीस वार्षिक महागाईत वाढ होऊ शकते, असे आरबीआयने म्हटले आहे.
सोन्या-चांदीचे ताजे दर
शुक्रवारी सोन्याचे भाव १,००० रुपयांनी वधारून १.५३ लाख रुपये (१० ग्रॅम) वर पोहोचले होते, तर चांदीची किंमत ३,००० रुपयांनी घसरून २,४०,५४० रुपये प्रति किलो वर बंद झाली.
