Gold Price : नुकतीच दिवाळी संपली असून आता लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. दिवाळीपूर्वी सोने-चांदीचे दर गगनाला भिडले होते, पण गेल्या १० दिवसांपासून या मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. असे असले तरी सामान्य ग्राहकांना सोने खरेदी करणे आजही परवडत नसले तरी, दुसरीकडे एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. मार्च २०२५ ते सप्टेंबर २०२५ या केवळ सात महिन्यांच्या कालावधीत ६४ टन (म्हणजे ६४,००० किलो) सोने भारतात आणले गेले आहे. हे सोने कोणी आणि कुठून आणले, या प्रश्नाचे उत्तर आहे भारतीय रिझर्व्ह बँक!
७ महिन्यांत ६४ टन सोनं भारतात
जागतिक भू-राजकीय तणावामुळे आणि वित्तीय युद्ध सदृश्य परिस्थितीमुळे 'सॉव्हरेन ॲसेट्स' परदेशात ठेवण्याबद्दल वाढलेल्या जागतिक शंकांदरम्यान, आरबीआयने आपल्या सोन्याचा साठा मायदेशी आणण्याची प्रक्रिया वेगवान केली आहे.
सप्टेंबरच्या अखेरीस आरबीआयकडे एकूण ८८०.८ टन सोने होते. यापैकी ५७५.८ टन सोने आता आरबीआयने भारतात आणले आहे. उर्वरित २९०.३ टन सोने बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्स यांच्या ताब्यात ठेवले आहे. याव्यतिरिक्त, आरबीआयकडे 'गोल्ड डिपॉझिट' म्हणून १४ टन सोने आहे.
मार्च २०२३ पासून मोठा बदल
भारताच्या सेंट्रल बँकेने मार्च २०२३ पासून आतापर्यंत तब्बल २७४ टन सोने भारतात परत आणले आहे. सोन्याचा साठा मायदेशी आणण्याचा हा निर्णय रशिया-युक्रेन युद्ध तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर सुरू झाला होता. या दोन्ही घटनांमध्ये G7 देशांनी रशिया आणि अफगाणिस्तानचा परकीय चलन साठा जप्त केला होता.
इकोनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, पाईनट्री मॅक्रोचे संस्थापक रितेश जैन यांचे मत आहे की, "जगात कायद्याचे राज्य तुटले आहे आणि G-7 ने रशियाचे परकीय चलन साठे जप्त केले आहेत. अशा भू-राजकीय दृष्ट्या अस्थिर जगात, भारताच्या सेंट्रल बँकेने सोने परत आणण्याची प्रक्रिया वाढवणे योग्य आहे."
वाचा - फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
यापूर्वी, ३१ मार्चपर्यंत आरबीआयकडे ८७९ टन सोने होते, त्यापैकी ५१२ टन देशात आणि ३४८.६ टन सोने परदेशात ठेवलेले होते. आता देशात ठेवलेल्या सोन्याचा साठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
