India safest bank list : गेल्या काही वर्षात देशातील काही बँका कायमच्या बंद झाल्याने लाखो गुंतवणूकदारांचे पैसे अडकले. अशा परिस्थितीत आपली कष्टाची कमाई बँकेत जमा करताना प्रत्येक व्यक्तीच्या मनात एकच प्रश्न असतो, 'माझे पैसा सुरक्षित राहतील ना? जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया), एचडीएफसी बँक किंवा आयसीआयसीआय बँकमध्ये असेल, तर तुमच्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अत्यंत दिलासादायक बातमी दिली आहे. केंद्रीय बँकेने या तीन बँकांना देशातील सर्वात सुरक्षित बँकांच्या श्रेणीत कायम ठेवले आहे.
बँकिंगच्या भाषेत या बँकांना 'डोमेस्टिक सिस्टमिकली इम्पॉर्टन्ट बँक्स' असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, या बँका 'टू बिग टू फेल' म्हणजे एवढ्या मोठ्या आहेत की, त्यांचे अयशस्वी होणे देशाच्या संपूर्ण आर्थिक व्यवस्थेसाठी धोकादायक ठरू शकते.
'VIP सुरक्षा कवच' मिळाल्याचा अर्थ काय?
आरबीआयने या तीन बँकांना D-SIB चा दर्जा दिल्याने, या बँकांवर सामान्य बँकांच्या तुलनेत अधिक कडक देखरेख ठेवली जाते. या बँकांचे कार्यक्षेत्र खूप मोठे आहे आणि त्यांचे देशाच्या जीडीपीमध्ये मोठे योगदान आहे. यामुळे, जर भविष्यात या बँकांवर कोणतेही मोठे आर्थिक संकट आले, तर भारत सरकार स्वतः पुढे येऊन या बँकांना वाचवेल. म्हणजेच, या बँकांमध्ये जमा केलेला तुमचा पैसा पूर्णपणे सुरक्षित मानला जातो. या बँकांचे कामकाज बंद होण्याची चिंता करण्याची गरज नाही.
बँक निवडतानाचा गैरसमज दूर
अनेक लोक सरकारी बँकांना खासगी बँकांपेक्षा अधिक सुरक्षित मानतात, मात्र RBI च्या या यादीने हा गैरसमज दूर केला आहे. या VIP यादीत एक सरकारी बँक (SBI - २०१५ मध्ये समावेश) आणि दोन खासगी बँका (ICICI Bank - २०१६ आणि HDFC Bank - २०१७ मध्ये समावेश) यांचा समावेश आहे. या तिन्ही बँका तेव्हापासून या यादीत कायम आहेत.
सुरक्षिततेसाठी अतिरिक्त भांडवल अनिवार्य
या विशेष सुरक्षा कवचासोबतच, या बँकांवर मोठी जबाबदारी देखील येते. आरबीआयच्या नियमांनुसार, या बँकांना सामान्य बँकांच्या तुलनेत त्यांच्याकडे जास्त 'कॅपिटल' (जास्त रोकड) राखीव ठेवावी लागते. या निधीला 'कॉमन इक्विटी टियर १' असे म्हणतात.
RBI च्या नियमांनुसार, SBI (बकेट ४) ला सर्वात जास्त ०.८०% अतिरिक्त टियर-१ कॅपिटल ठेवावे लागेल. तर HDFC Bank (बकेट २) ला ०.४०% आणि ICICI Bank (बकेट १) ला ०.२०% अतिरिक्त भांडवल ठेवणे बंधनकारक आहे. हे कडक नियम १ एप्रिल २०२७ पासून पूर्णपणे लागू होतील, ज्यामुळे या बँका अधिक आर्थिकदृष्ट्या मजबूत बनतील.
वाचा - फार्मा क्षेत्रातील दुसरी सर्वात वेगवान वाढणारी कंपनी IPO आणतेय; एका लॉटसाठी किती पैसे लागणार?
आरबीआयने या बँकांना D-SIB म्हणून घोषित केल्यामुळे, या बँका मोठे आर्थिक धक्के सहन करण्यास सक्षम आहेत आणि तुमच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री मिळते.
