नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय बँकेने शेतकऱ्यांसाठी कॉलेटरल फ्री लोनची मर्यादा वाढवली आहे. आता शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्ज विनातारण मिळणार आहे. यापूर्वी ही मर्यादा १.६० लाखापर्यंत होती जी आरबीआयनं २०१९ साली वाढवली होती. ५ वर्षांनी आरबीआयनं घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठा दिलासादायक मानला जात आहे.
आता ज्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जाची आवश्यकता असेल ते कोणतीही मालमत्ता गहाण न ठेवता कर्ज मिळवू शकतात. त्यासाठी ओळख आणि अन्य कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेमुळे छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या योजनेमुळे बहुतांश शेतकरी कर्जाचा लाभ घेऊ शकतात. आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला.
काय असतं कॉलेटरल फ्री लोन?
कॉलेटरल फ्री लोन हे असं कर्ज आहे ज्यामध्ये तुम्हाला कर्ज घेताना कुठलीही ठेव जमा करावी लागत नाही. सर्वसाधारणपणे कर्जाचे दोन प्रकार आहेत. प्रथम असुरक्षित (वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्डवरील कर्ज), ज्यामध्ये तुम्हाला कोणतीही सुरक्षा जमा करण्याची गरज नाही. दुसरे म्हणजे गृह कर्ज, कार कर्ज, सुवर्ण कर्ज, व्यवसाय कर्ज यासारखे सुरक्षित कर्ज. ते घेताना बँक तुमच्याकडून सुरक्षा घेते. आता ही सुरक्षाही दोन प्रकारची आहे. पहिली प्राइम आणि दुसरी कॉलटरल सुरक्षा. कर्जदार कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ असल्यास बँक ती ठेव विकून त्यांचे पैसे काढते.
कुठून घेऊ शकता कॉलेटरल फ्री लोन?
खाजगी आणि सरकारी दोन्ही बँकांकडून कॉलेटरल फ्री कर्ज घेतले जाऊ शकते. यासाठी १०.५० टक्क्यांहून अधिक व्याजदर आहे. कोणत्याही मालमत्तेची हमी न देता तारणमुक्त कर्ज दिले जाते.
रेपो रेटमध्ये बदल नाही
महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक रेपो दर कमी करेल अशी आशा सर्वांना होती. आज आरबीआयची चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) द्वैमासिक आढावा बैठकीतील निर्णय जाहीर करण्यात आले. यात आरबीआयने सलग ११व्यांदा रेपो दरात कोणतेही बदल केले नाहीत. परिणामी तुमचा ईएमआय स्वस्त होणार नाही.