आजही देशातील अनेक सेवांमध्ये ब्रिटिशकालीन अनेक परंपरा दिसून येतात. यांपैकी अनेक परंपरांमध्ये काळानुरूप बदल झाले आणि होतही आहेत. आता रेल्वे मंत्रालयाने एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार, आता रेल्वेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आता 'गोल्ड प्लेटेड' चांदीचे नाणे दिले जाणार नाही.
भ्रष्टाचार आणि वाढता खर्च -
माध्यमांनी रेल्वे सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, चांदीच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि या यासंपूर्ण प्रक्रियेत झालेला भ्रष्टाचार, ही या निर्णयामागची मुख्य कारणे माणली जात आहेत. मध्य प्रदेशातून नुकताच एक धक्कादायक प्रकार समोर आला होता, तेथे निवृत्तीवेळी देण्यात आलेली चांदीची नाणी भेसळयुक्त आढळली. तपासणीत या नाण्यांमध्ये चांदीचे प्रमाण अत्यंत कमी असून ती प्रामुख्याने तांब्याची आढळली. खरेदी प्रक्रियेत झालेल्या या गैरव्यवहारामुळे अखेर ही परंपराच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रेल्वे बोर्डाचं सर्व झोनना पत्र -
यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून सर्व झोन आणि उत्पादन युनिट्सना पत्र पाठवण्यात आले आहेत. यात, "निवृत्त होणाऱ्यां कर्मचाऱ्यांना गोल्ड कोटेड चांदीचे नाणे अथवा पदक देण्याची परंपरा आता संपुष्टात आली आहे. ज्या रेल्वे विभागांकडे नाण्यांचा साठा शिल्लक आहे, त्याचा योग्य हिशोब ठेवून त्यांचा वापर अन्य उपक्रमांसाठी करावा," असे म्हणण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, या निर्णयाला राष्ट्रपतींचीही मंजुरी मिळाली आहे.
केव्हापासून सुरू होती परंपरा? -
ही परंपरा मार्च २००६ मध्ये सुरू झाली होती. त्यावेळी २० ग्रॅम वजनाच्या या चांदीच्या नाण्याची किंमत सुमारे १,००० रुपये होती, जी आता १०,००० रुपयांच्या घरात पोहोचली आहे. महत्वाचे म्हणजे, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अनेक प्रकारची चिंता होती, जसे की, बाहेरील वेंडर्सकडून खरेदी विकत घेतलेल्या नाण्याची क्वालिटी योग्य नव्हती. याशिवाय, चांदी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वधारल्याने खर्च कमी करणेही आवश्यक होते.
