केंद्र सरकार १ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे. गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित असलेली रेल्वे तिकीट सवलत पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अर्थ मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय यांच्यात या सवलतींबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, आगामी अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण याची घोषणा करू शकतात.
कोविड-१९ महामारीच्या काळात (मार्च २०२०) बंद करण्यात आलेली ही सुविधा आता नव्या स्वरूपात परत येऊ शकते. ५८ वर्षांवरील महिला प्रवाशांना रेल्वे तिकिटावर थेट ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, ३००० रुपयांचे तिकीट अवघ्या १५०० रुपयांत मिळू शकेल.
पुरुषांसाठी ४०% सवलत: ६० वर्षांवरील पुरुष प्रवाशांना ४० टक्के सवलत मिळण्याचे संकेत आहेत. ही सवलत स्लीपर आणि ३-टियर एसी (3AC) पुरती मर्यादित राहण्याची चर्चा असली, तरी १-एसी आणि २-एसीसाठीही मागणी जोर धरत आहे.
सवलत का बंद झाली होती?
कोविड काळात रेल्वेचे उत्पन्न घटल्याने आणि आर्थिक बोजा वाढल्याने ही सवलत तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. यामुळे सरकारला दरवर्षी सुमारे १,६०० ते २,००० कोटी रुपयांची बचत होत होती. मात्र, आता रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारल्याने आणि ज्येष्ठांच्या वाढत्या मागणीमुळे सरकार ही सुविधा पुन्हा सुरू करण्याच्या मनस्थितीत आहे.
अंमलबजावणी कशी होणार?
सूत्रांनुसार, ही सवलत मिळवण्यासाठी कोणत्याही विशेष कार्डाची गरज भासणार नाही. पूर्वीप्रमाणेच IRCTC च्या वेबसाईटवर किंवा रेल्वे काउंटरवर तिकीट बुक करताना केवळ वयाचा उल्लेख केल्यास ही सवलत लागू होईल.

