मुंबई - डिजिटल फसवणुकीला लगाम घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) १० हजार रुपयांवरील नवीन व्यवहारांसाठी एक तासाचा ‘टाइम लॅग’ (प्रतीक्षा कालावधी) ठेवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मात्र, या प्रस्तावामुळे देशातील डिजिटल पेमेंट क्रांतीला ब्रेक लागेल, अशी भीती बँकिंग आणि फिनटेक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
आरबीआयने जारी केलेल्या एका ‘चर्चापत्रा’त यासंबंधीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यानुसार, जर तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला (ज्याला आधी कधीही पैसे पाठवले नाहीत) १० हजार रुपयांहून अधिक रक्कम पाठवत असाल, तर तो व्यवहार पूर्ण होण्यासाठी एक तासाचा अवधी लागेल. वित्त वर्ष २०२५ मध्ये सुमारे ३५ हजार कोटींची डिजिटल फसवणूक झाली असून, त्यातील ९९ टक्के फसवणूक १० हजारांवरील व्यवहारांत झाली आहे. ही फसवणूक रोखण्यासाठी हा एक तासाच्या ‘गोल्डन अवर’चा उपाय सुचवण्यात आला आहे.
