नवी दिल्ली: अॅप आधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या खाजगी कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावत कॅब चालकांना मालक बनवण्यास केंद्र सरकारने कंबर कसली असून 'भारत टॅक्सी' या सहकारी तत्त्वावरील प्लॅटफॉर्मवर चालकांना किमान भाडे (बेस रेट) निश्चित करून दिले जाईल. 'भारत टॅक्सी'चा चालक आता ड्रायव्हर नसून 'सारथी' असेल," अशी घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी सोमवारी दिल्लीत केली.
शाह यांनी दिल्ली-एनसीआर आणि गुजरातमधील चालकांसोबत चर्चा केली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
महिलांसाठी 'सारथी दीदी'
महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अॅपमध्ये 'सारथी दीदी' हे विशेष फीचर असेल. त्याद्वारे महिला प्रवाशी महिला चालकांना प्राधान्य देऊ शकतील. तसेच, चालकांच्या तक्रार निवारणासाठी कॉल सेंटर व फिजिकल ऑफिस असेल. नवीन गाडीसाठी सहकारी बँकांमार्फत सुलभ कर्ज आणि इफ्को टोकियोमार्फत विमा संरक्षणही दिले जाणार आहे.
अमूल मॉडेलची पुनरावृत्ती
ज्याप्रमाणे ३६ लाख माता-भगिनींनी एकत्र येत १.२५ लाख कोटींची 'अमूल' उभी केली, तसेच हे मॉडेल असेल, असे सांगत शाह यांनी ३ वर्षांचा रोडमॅप मांडला.
तीन वर्षात प्रत्येक महापालिका क्षेत्रात ही सेवा पोहोचवण्याचे आणि १५ कोटी चालकांना जोडण्याचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.
खाजगी कंपन्या चालकांकडून २५-३०% कमिशन कापून स्वतःचा खिसा भरतात. मात्र, 'भारत टॅक्सी'मध्ये ८०% नफा थेट चालकांना मिळेल आणि उर्वरित २०% सहकारी भांडवल म्हणून राखले जाईल. केवळ ५०० रुपयांचा शेअर खरेदी करून चालक या संस्थेचे सह-मालक बनू शकतील. -अमित शाह, गृह व सहकार मंत्री
