government company : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात अनेक दिग्गज कंपन्यांना मंदीचा अनुभव आला. असे असतानाही, सेन्सेक्समधील टॉप-१० सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी चार कंपन्यांनी मात्र एकत्रितपणे १,०१,३६९.५ कोटी रुपयांनी बाजार भांडवल वाढवले. यात रिलायन्स आणि टीसीएस सारख्या मोठ्या कंपन्यांना सरकारीने कंपनी वरचढ ठरली आहे. या घसरणीच्या काळात भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात एलआयसी सर्वात जास्त नफ्यात राहिली.
गेल्या आठवड्यात, बीएसईच्या ३० शेअर्सचा सेन्सेक्स २७०.०७ अंकांनी (०.३३%) घसरून बंद झाला. अशा प्रतिकूल परिस्थितीतही एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एलआयसी यांचे बाजारमूल्य वाढले, जे एक सकारात्मक संकेत आहे.
LIC ला सर्वाधिक फायदा, SBI आणि Airtel चीही दमदार कामगिरी!
या आठवड्यात बाजारमूल्य वाढलेल्या कंपन्यांमध्ये एलआयसीने सर्वाधिक ५९,२३३.६१ कोटी रुपयांचा फायदा मिळवला. या वाढीमुळे एलआयसीचे बाजारमूल्य ६,०३,१२०.१६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. त्यापाठोपाठ, स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल १९,५८९.५४ कोटी रुपयांनी वाढून ७,२५,०३६.१३ कोटी रुपये झाले. भारती एअरटेलचे मार्केट कॅप १४,०८४.२ कोटी रुपयांनी वाढून १०,५८,७६६.९२ कोटी रुपयांवर पोहोचले. तर, एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल ८,४६२.१५ कोटी रुपयांनी वाढून १४,८९,१८५.६२ कोटी रुपये झाले आहे.
रिलायन्ससह 'या' दिग्गज कंपन्यांना तोटा!
एकीकडे काही कंपन्या नफ्यात राहिल्या, तर दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ICICI बँक, इन्फोसिस, बजाज फायनान्स आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांचे बाजार भांडवल एकत्रितपणे ३४,८५२.३५ कोटी रुपयांनी घटले.
- रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्यांकन ७,६४५.८५ कोटी रुपयांनी घसरून १९,२२,६९३.७१ कोटी रुपयांवर आले.
- टीसीएसचे मार्केट कॅप १७,९०९.५३ कोटी रुपयांनी घसरले.
- बजाज फायनान्स आणि आयसीआयसीआय बँकेलाही अनुक्रमे ४,०६१.०५ कोटी आणि २,६०५.८१ कोटी रुपयांचा तोटा झाला.
- हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे बाजार भांडवल १,९७३.६६ कोटी रुपयांनी, तर इन्फोसिसचे मार्केट कॅप ६५६.४५ कोटी रुपयांनी घटले.
टॉप-१० कंपन्यांच्या यादीत कोण कुठे?
बाजार भांडवलाच्या बाबतीत टॉप-१० कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर कायम आहे. त्यानंतर अनुक्रमे एचडीएफसी बँक, टीसीएस, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस, एलआयसी, बजाज फायनान्स आणि हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड यांचा क्रमांक लागतो.
बाजारातील एकूण मंदी असूनही काही कंपन्यांनी आपली स्थिती मजबूत केल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते.