Stock Market Crisis : जागतिक अर्थव्यवस्थेवर सध्या २००८ च्या महामंदीपूर्वी होते तसे ढग पुन्हा एकदा जमा होऊ लागले आहेत. जगातील सर्वात मोठी बँक असलेल्या 'जेपी मॉर्गन चेस'चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी डायमन यांनी हा खळबळजनक इशारा दिला आहे. सध्याची बाजारपेठेतील स्थिती २००५-०७ च्या काळाशी मिळतीजुळती असून, गुंतवणूकदार नफ्याच्या नशेत पुढील धोक्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
'२००८' ची आठवण का येतेय?
जेमी डायमन यांच्या मते, सध्या बाजारात 'भरती' आली आहे आणि सर्वच नौका वर जात आहेत. म्हणजेच, जवळपास प्रत्येक गुंतवणूकदार सध्या नफा कमावत आहे. मात्र, ही स्थिती फसवी असू शकते. अधिक नफा मिळवण्यासाठी अनेक वित्तीय संस्था आणि गुंतवणूकदार सध्या अत्यंत जोखमीचे निर्णय घेत आहेत. बाजारात स्वतःला 'विजेता' सिद्ध करण्यासाठी काही लोक नको तितकी जोखीम उचलत आहेत, जी भविष्यात अंगाशी येऊ शकते.
'AI' मुळे सॉफ्टवेअर क्षेत्राला सुरुंग लागणार?
डायमन यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबतही महत्त्वाची चिंता व्यक्त केली आहे. २००८ पूर्वी वर्तमानपत्रे, वीज आणि फोन कंपन्या अत्यंत सुरक्षित मानल्या जात होत्या, पण नंतर त्या संकटात सापडल्या. यावेळी 'एआय'मुळे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत मोठे बदल होत आहेत. अँथ्रोपिक सारख्या कंपन्यांनी आणलेल्या नवीन 'एआय एजंट्स'मुळे कायदेशीर, सेल्स, मार्केटिंग आणि डेटा अॅनालिसिसमधील अनेक कामे स्वयंचलित होणार आहेत. यामुळे पारंपरिक बिझनेस मॉडेल्स मोडीत निघण्याची भीती आहे.
मालमत्तांच्या वाढत्या किमती: दिलासा नाही तर धास्ती!
जेमी डायमन यांच्या मते, शेअर बाजार किंवा प्रॉपर्टीच्या वाढलेल्या किमती आनंद देण्याऐवजी भीती वाढवणाऱ्या आहेत. "मालमत्तांच्या किमती जेव्हा प्रमाणाबाहेर वाढतात, तेव्हा त्यांच्या कोसळण्याचा धोकाही तितकाच मोठा असतो. सध्या बाजार सामान्य दिसत असला तरी आतून मात्र जोखीम वाढत आहे." नवीन आर्थिक चक्र कधीही सुरू होऊ शकते, पण त्याचे नेमके कारण काय असेल हे सांगणे कठीण आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वाचा - गुंतवणुकीचा 'सुपर' प्लॅन! ५ वर्षांत १० लाखांचे लक्ष्य गाठण्यासाठी किती असावी तुमची मंथली SIP?
टेक शेअर्समध्ये घबराट
'एआय' तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांवर आणि कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होईल, या भीतीने जागतिक बाजारात टेक शेअर्समध्ये मोठी विक्री पाहायला मिळाली. गुंतवणूकदार आता पारंपरिक आयटी मॉडेलकडून एआय-आधारित मॉडेलकडे वळताना होणाऱ्या स्थित्यंतरामुळे सावध झाले आहेत.
