Inflation Value of 1 Cr in 20 Years: आपण अनेकदा टॅक्स, बाजारातील चढउतार आणि गुंतवणुकीवरील परतावा याबद्दल बोलतो. मात्र, महागाईचा पैशाच्या मूल्यावर काय परिणाम होतो, याविषयी आपण क्वचितच चर्चा करतो. खरं म्हणजे महागाईमुळे तुमच्या पैशाचं मूल्य रोज कोणत्या ना कोणत्या प्रकारे कमी होत जातं. त्यामुळे निवृत्तीनंतरचा खर्च आणि अशा इतर गरजांसाठी मोठा निधी उभारायचा असेल, तर महागाईचा परिणाम लक्षात घ्यायला हवा.
महागाई म्हणजे काय?
महागाई म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमतीत झालेली वाढ. उदाहरणार्थ, जर आज अंड्याची किंमत ६ रुपये असेल आणि पुढच्या वर्षी ही किंमत ७ रुपयांपर्यंत गेली तर ती महागाई आहे. एका अंड्याची किंमत एका वर्षात ६ रुपयांवरून ७ रुपये झाली झाली, म्हणजे वर्षभरात त्याच्या किमतीत १५ टक्क्यांनी वाढ झाली. काळाच्या ओघात बहुतांश वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात. याचं कारण म्हणजे महागाई.
कसा करतं परिणाम?
सर्वसाधारणपणे महागाईकडे आपण फारसं लक्ष देत नाही. परंतु, दीर्घकाळात यामुळे आपल्या पैशाचं मूल्य लक्षणीयरीत्या कमी होतं. आज तुम्ही १ कोटी रुपयांत जेवढ्या वस्तू खरेदी करू शकता, १०-२० नंतर तुम्ही त्यात फारच कमी खरेदी करू शकाल. वार्षिक महागाई दर ७ टक्के गृहीत धरला तर सध्याचं एक कोटी रुपयांचे मूल्य २० वर्षांनंतर केवळ २५.८४ लाख रुपयांवर येईल. म्हणजेच २० वर्षांनंतर निवृत्तीसाठी १ कोटी रुपयांचा निधी तयार करायचा असेल तर जवळपास ४ कोटी रुपयांचं प्लॅनिंग करावं लागेल.
काय लक्षात ठेवावं लागेल?
असे अनेक खर्च आहेत, जे २० वर्षांनंतर अनेक पटींनी वाढतील. उदाहरणार्थ, जर आज शाळेची फी वार्षिक १ लाख रुपये असेल तर २० वर्षांनंतर ती ३.८७ लाख रुपये होईल. आज जर तुम्ही एखाद्या शस्त्रक्रियेवर ५ लाख रुपये खर्च करत असाल तर २० वर्षांनंतर तुम्हाला १९.३५ लाख रुपये खर्च करावे लागतील. जर तुमच्या कुटुंबाचा खर्च आज दरमहा ५० रुपये असेल तर २० वर्षांनंतर तो १.९३ लाख रुपये होईल. ही आकडेवारी थक्क करणारी आहे. पण हे सत्य आहे.
हा परिणाम कमी करण्याचे मार्ग काय?
केवळ बचत करून चालणार नाही
जर तुम्ही फक्त बचत केली तर तुमच्या पैशाचं मूल्य दिवसेंदिवस कमी होत जाईल. पैशाचं मूल्य कमी होण्याऐवजी वाढवायचं असेल तर ज्या गुंतवणुकीचा परतावा महागाईदरापेक्षा जास्त आहे, अशा गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये पैसे गुंतवावे लागतील. उदाहरणार्थ, जर तुम्ही बँक बचत खात्यात पैसे ठेवले तर त्यावर तुम्हाला ३.५% व्याज मिळतं. जर महागाईचा दर ५ टक्के असेल तर याचा अर्थ असा होतो की आपल्या पैशाचं मूल्य दररोज घसरत आहे.
योग्य ठिकाणी पैसे गुंतवा
जास्त परतावा देणाऱ्या गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्यावर तुमचा भर असायला हवा. उदाहरणार्थ, म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनेचा सरासरी परतावा दीर्घ कालावधीत सुमारे १०-१२ टक्के मानला जातो. याचा अर्थ असा की जर तुम्ही म्युच्युअल फंड योजनांमध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर तुम्ही महागाईचा प्रभाव कमी तर करू शकालच, शिवाय तुमच्या पैशाचं मूल्यही वाढवू शकाल.
(टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)