नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीनी उच्चांक गाठला आहे. याचा थेट फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता असून, देशाला दरमहा ७ ते ८ अब्ज डॉलर (सुमारे ६४,३०० ते ७३,५०० कोटी रुपये) अतिरिक्त परकीय चलन खर्च करावे लागणार आहेत. यामुळे देशांतर्गत महागाई वाढण्यासोबतच चालू खात्यातील तूट वाढण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
काय म्हणतात तज्ज्ञ ?
कच्च्या तेलाच्या किमतीत १० डॉलरची वाढ झाल्यास चालू खात्यातील तूट जीडीपीच्या १.९ ते २.२ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. याचा परिणाम किरकोळ महागाईपेक्षा घाऊक महागाईवर अधिक होईल.
अदिती नायर, मुख्य अर्थतज्ज्ञ, इक्रा
गॅसच्या किमती दुप्पट, अर्थकारण विस्कळीत
काही काळापूर्वी ६६ डॉलर प्रतिबॅरलवर असलेले कच्चे तेल ९३ डॉलरवर पोहोचले आहे. केवळ तेल नव्हे, तर नैसर्गिक वायूच्या किमतीही दुपटीने वाढल्या आहेत.
भारत आपल्या गरजेच्या ८५ टक्के कच्चे तेल आयात करतो, तर नैसर्गिक वायूच्या गरजेपैकी जवळपास निम्मा भाग आयात करावा लागतो.
दररोज ५० लाख बॅरल तेलाचा वापर भारतात होतो. तेलाची किमत वाढल्याने वाहतूक, उत्पादन शुल्क व अन्नधान्याच्या किमतीवर परिणाम होणार आहे.
