लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली:भारताने मार्च २०२५ मध्ये दररोज ५४ लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात करून नवीन विक्रम केला आहे. २०२५ आणि २०२६ मध्ये भारतातील कच्च्या तेलाची मागणी सर्वांत वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे आणि ती चीनच्या मागणीच्या दुप्पट असेल, असे ओपेकने म्हटले आहे.
वाढत्या ऊर्जेच्या गरजांमुळे ही मागणी वाढत आहे. मागणीतील ही वाढ २०२५ मध्ये चीनच्या तेलमागणीतील १.५ टक्के आणि २०२६ मध्ये १.२५ टक्के वाढीच्या अंदाजापेक्षा जास्त आहे, असे ‘ओपेक’ने म्हटले आहे. भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान भारत सरकारने इंधनाच्या बाबतीत कोणतीही टंचाई निर्माण होणार नाही, अशी ग्वाही दिली होती. त्यालाही याच आयात केलेल्या तेलाच्या विक्रमी साठ्याचा संदर्भ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मंदगतीने वाढ होत असली तरी, ‘ओपेक’ला २०२५ आणि २०२६ मध्ये जागतिक तेलमागणी १३ लाख बॅरल प्रतिदिन वाढण्याची अपेक्षा आहे, जी त्यांच्या मागील अंदाजापेक्षा अपरिवर्तित आहे. ६.८ टक्क्यांनी किमती घसरून कच्च्या तेलाच्या किमती ६८.९८ बॅरलवर आल्या आहेत. ५.९ टक्क्यांनी गॅसमध्ये, एलपीजी मागणीत ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.