भारताच्या भांडवली बाजारात एका नवीन युगाची सुरुवात झाली आहे आणि आजची तरुण पिढी विशेषतः २५ वर्षांखालील, फक्त बचत करण्यापुरते मर्यादित नाहीत तर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. २०२४ मध्ये, अशा तरुणांकडून आयटीआर-३ फॉर्म भरण्यात ६००% पेक्षा जास्त वाढ झाली. या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय की आता गुंतवणूक करणं हा केवळ अनुभवी लोकांचा खेळ नाही तर जनरेशन झेडनंही त्यात मोठी उडी घेतली आहे.
डीमॅट खातीही उघडली
गेल्या आर्थिक वर्षात २०२३-२४ मध्ये सुमारे ३.७ कोटी नवीन डीमॅट खाती उघडण्यात आली. हे भारतातील शेअर बाजारात तरुणांचा वाढता सहभाग असल्याचं लक्षण आहे आणि संकेतांनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात ही संख्या आणखी वाढू शकते. हे नवीन गुंतवणूकदार केवळ शिकण्यासाठी येत नाहीत तर ते पैसे कमविण्याबाबत गंभीर आहेत आणि चांगली रक्कम गुंतवत आहेत.
सतर्कता देखील आवश्यक
तरुण गुंतवणूकदारांची संख्या झपाट्यानं वाढत असताना, एका अहवालात असंही म्हटलंय की २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान सहन करावं लागलंय. त्या तुलनेत, ३० ते ३५ वयोगटातील गुंतवणूकदारांनी अधिक विचारपूर्वक गुंतवणूक केली आहे आणि स्थिर परतावा मिळवला आहे. सामान्यतः तरुणांना जलद वाढ हवी असते, तर वृद्ध गुंतवणूकदार जोखीम टाळतात आणि स्थिर उत्पन्नाकडे वाटचाल करतात.
एकदा आले, नंतर माघार नाही
आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे गुंतवणुकीच्या जगात एकदा प्रवेश केलेला तरुण पुन्हा कधीही बाहेर पडला नाही. २०२४ मध्ये आयटीआर-३ दाखल करणाऱ्यांचा पार्टिसिपेशन रेट ९१.६% होता, तर २०२५ मध्येही तो ६८% च्या मजबूत पातळीवर राहिला. वार्षिक आधारावर आयटीआर दाखल करणाऱ्या नवीन युजर्सच्या संख्येत ५८% वाढ झाली. यावरून असं दिसून येतंय की बाजारात प्रवेश करणारी ही तरुण पिढी दूरपर्यंतचा विचार करत आहे.