रेल्वे प्रवासादरम्यान “आता कोणते स्टेशन येईल?”, “ट्रेन उशिरानं धावत आहे का?” किंवा “कोचमध्ये लाईट का नाहीये?” असं प्रश्न प्रत्येक प्रवाशाच्या मनात येतात. आता या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी ना कॉल करावा लागणार, ना तासनतास वाट पाहावी लागणार. प्रवाशांची सोय अधिक सुधारण्यासाठी भारतीय रेल्वेनं एक नवीन आणि सोपा उपाय आणलाय. रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक १३९ वर SMS सेवा सुरू केली आहे, ज्याद्वारे प्रवासी एक साधा मेसेज पाठवून महत्त्वाची माहिती मिळवू शकतील आणि आपल्या तक्रारी नोंदवू शकतील.
आतापर्यंत प्रवाशांना PNR स्टेटस, ट्रेनची वेळ किंवा इतर माहिती घेण्यासाठी १३९ वर कॉल करावा लागत होता. कॉल कनेक्ट होण्यासाठी वेळ लागायचा आणि अनेकदा नेटवर्क किंवा व्यस्ततेमुळे अडथळे येत असत. हीच समस्या लक्षात घेऊन रेल्वेने आता कॉलसोबतच SMS आधारित सेवा सुरू केली आहे, जेणेकरून प्रवाशांना त्वरित आणि कोणत्याही कटकटीशिवाय माहिती मिळू शकेल.
भारत-चीन यांच्यातील जवळीक वाढली; निर्यातीत जोरदार वाढ, 'या' भारतीय वस्तूंना मोठी मागणी
प्रवाशांच्या गरजेवर लक्ष
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. पूर्वी १३९ कॉल सेवा आणि ‘रेल मदत’ ॲपद्वारे प्रवाशांना साहाय्य दिले जात असे. आता SMS सेवा जोडल्यामुळे ही यंत्रणा अधिक सोपी आणि प्रभावी झाली आहे. या सेवेद्वारे प्रवासी आपले PNR स्टेटस, ट्रेनच्या आगमनाची आणि सुटण्याची वेळ, ट्रेनचं सध्याचं लोकेशन आणि संचालनाशी संबंधित माहिती काही सेकंदात मिळवू शकतात.
SMS द्वारे त्वरित तक्रार
इतकंच नाही तर, ट्रेनमध्ये प्रवास करताना किंवा स्टेशनवर वाट पाहत असताना काही अडचण आल्यास, प्रवासी त्याची तक्रारही SMS द्वारे नोंदवू शकतात. अस्वच्छता, शौचालयाची खराब स्थिती, पाण्याची कमतरता, विजेची समस्या किंवा इतर गैरसोयींची माहिती थेट रेल्वेपर्यंत पोहोचवता येईल. तक्रारीचा SMS रेल्वे यंत्रणेला मिळताच, संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्वरित निवारणासाठी पाठवलं जाईल. यामुळे समस्यांचे निराकरण पूर्वीपेक्षा अधिक वेगानं होऊ शकेल.
प्रवास होईल सोपा
रेल्वेचा असा विश्वास आहे की, या उपक्रमामुळे प्रवाशांचा अनुभव सुधारेल आणि त्यांना प्रवासादरम्यान अधिक विश्वास व सुविधा मिळेल. विशेषतः वृद्ध प्रवाशांसाठी आणि ज्यांना ॲप किंवा मोठे कॉल टाळायचे आहेत अशा लोकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरेल. एकंदरीत, रेल्वेचा हा नवीन “SMS जुगाड” प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा, जलद आणि तणावमुक्त करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानलं जात आहे.
