EMI vs SIP in Financial Crisis : नोकरी जाणे किंवा व्यवसायात मंदी येणे यांसारखी संकटे सांगून येत नाहीत. जेव्हा अचानक उत्पन्नाचा स्रोत थांबतो, तेव्हा कर्जाचे हप्ते आणि गुंतवणुकीची एसआयपी ही मोठी चिंतेची कारणे बनतात. अशा वेळी घाबरून जाण्यापेक्षा कोणता खर्च कमी करायचा आणि चालू ठेवायचा, हे समजून घेणे तुमच्या आर्थिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
ईएमआय ही तुमची कायदेशीर जबाबदारी
- तुमचे उत्पन्न थांबले असले तरी बँकेचे कर्ज थांबत नाही. त्यामुळे ईएमआयबाबत काही गोष्टी लक्षात ठेवा.
- क्रेडीट स्कोरवर परिणाम : जर तुम्ही ईएमआय भरला नाही, तर त्यावर दंड आकारला जातो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा 'सिबिल स्कोअर' खराब होतो. यामुळे भविष्यात कर्ज मिळणे कठीण होते.
- बँकेशी संपर्क साधा : जर आर्थिक अडचण गंभीर असेल, तर त्वरित बँकेशी संपर्क साधा. कर्ज पुनर्रचना, कर्जाचा कालावधी वाढवणे किंवा काही काळासाठी फक्त व्याज भरणे असे पर्याय बँक देऊ शकते. मात्र, हे पाऊल वेळेत उचलणे गरजेचे आहे.
एसआयपी : लवचिक आणि सुरक्षित पर्याय
- गुंतवणुकीच्या बाबतीत मात्र तुम्हाला मोठे स्वातंत्र्य असते.
- कधीही थांबवता येते : म्युच्युअल फंडमधील एसआयपी तुम्ही कधीही थांबवू शकता किंवा बंद करू शकता. यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर कोणताही परिणाम होत नाही.
- रोकड सुलभता : पगार थांबला असेल तर नवीन गुंतवणूक करण्याऐवजी तो पैसा दैनंदिन गरजांसाठी वापरणे जास्त शहाणपणाचे ठरते. तुमची आधीची गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहते आणि बाजाराच्या हालचालीनुसार वाढत राहते.
संकटात खर्चाचा प्राधान्यक्रम कसा असावा?
- जेव्हा हातात पैसा कमी असतो, तेव्हा या क्रमाने आर्थिक निर्णय घ्या.
- अत्यावश्यक खर्च : अन्न, औषधे आणि वीज बिल.
- कर्जाचे हप्ते : कायदेशीर अडचण टाळण्यासाठी याला प्राधान्य द्या.
- विमा कवच : तुमचे आरोग्य आणि जीवन विमा सुरू ठेवा, जेणेकरून वैद्यकीय संकट आल्यास मोठा फटका बसणार नाही.
- एसआयपी आणि गुंतवणूक : सर्वात शेवटी या गोष्टी थांबवा.
वाचा - सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
'इमर्जन्सी फंड'ची ताकद
अशा कठीण प्रसंगासाठीच तज्ज्ञ नेहमी किमान ६ महिन्यांच्या खर्चाचा 'इमर्जन्सी फंड' तयार ठेवण्याचा सल्ला देतात. हा निधी तुम्हाला उत्पन्नाविना असलेल्या काळात कर्ज आणि खर्चाचे ओझे पेलण्यास मदत करतो.
