नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या संकटात सापडल्या आहेत. तर काहींच्या पगारात कपात झाली आहे. कोरोनामुळे खिशावर परिणाम झाला असताना आता किचनचं बजेट कोलमडणार आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, मोदी सरकार खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढवण्याच्या विचारात आहे.
हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कँटिन सुरू झाल्यानंतर भाज्या आणि फळांचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यात आता खाद्य तेलाच्या वाढत्या दरांची भर पडू शकते. पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर भारतची घोषणा केली. त्यामुळे आयात शुल्क वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. याशिवाय तेलबियांचं उत्पादन वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. खाद्य तेलाच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न, रोजगाराच्या संधी वाढतील. याशिवाय आयातीवर होणारा खर्चदेखील कमी होईल.
सरकारनं खाद्य तेलाच्या आयातीला लगाम घालण्यासाठी तेल उद्योग वाढवण्यासाठी सल्ला मागितल्याची माहिती सॉल्वंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक बी. व्ही. मेहता यांनी दिली. तेलबियांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडे अनेक शिफारसी केल्याचं त्यांनी सांगितलं.
सरकारची योजना काय?
सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देश मोठ्या प्रमाणात मलेशियाकडून पाम तेलाची आयात करतो. आयात शुल्कात वाढ केल्यास पाम तेलाची किंमत वाढेल. त्यामुळे आयात घटेल. त्यामुळे राई, सोयाबीन, शेंगदाण्याच्या तेलाला असलेली मागणी वाढेल. त्यामुळे त्यांच्या उत्पादनातही वाढ होईल. तेलबियांचं उत्पादन वाढवण्यासाठी सरकार करातून आलेला पैसा खर्च करेल. यासाठी आयात शुल्क ५ टक्क्यांनी वाढवलं जाण्याची शक्यता आहे.
तेल आयातीवर कोट्यवधींचा खर्च
खाद्य तेलावरील सरकारचा आयात खर्च गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भारतातील मागणीच्या ७० टक्के खाद्य तेल आयात केलं जातं. यावर दरवर्षी १० अब्ज डॉलर खर्च होतात. भारतात राई, सोयाबीन, सूर्यफूलाच्या कच्च्या तेलावर ३५ टक्के आयात शुल्क आकारण्यात येतं. तर रिफाईंड पाम तेलावर ३७.५ टक्के आयात शुल्क आकारलं जातं.
सोने आज स्वस्त होण्याची शक्यता; 'हे' आहे कारण
कोरोना चाचण्यांमध्ये जगात भारताचा क्रमांक कितवा?; आकडेवारीनं वाढवली चिंता
CoronaVirus News: आता महागाईमुळे कंबरडं मोडणार?; 'या' वस्तू भाव खाण्याची शक्यता
'आत्मनिर्भर भारत'ला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न; किचनचं बजेट कोसळण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 15:20 IST2020-06-10T15:15:27+5:302020-06-10T15:20:03+5:30
'आत्मनिर्भर भारत'ला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न; किचनचं बजेट कोसळण्याची शक्यता
