Coconut Oil : नारळ तेल आता सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहे. गेल्या काही काळापासून भारतासह संपूर्ण आशियामध्ये त्याच्या किमती खूप वाढल्या आहेत. भारतात गेल्या दोन वर्षांत दर जवळजवळ तिप्पट झालाय. कमी उत्पादन आणि नारळाच्या पाण्याची वाढती मागणी यामुळे आता नारळ तेल 'व्हीआयपी' बनलं आहे. २०२४ च्या उत्तरार्धात नारळ तेलाच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली. भारतापासून आग्नेय आशियापर्यंत हवामान आणि कीटकांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनावर परिणाम झाला. भारतात नारळ तेलाची किंमत आता प्रति टन ४.२३ लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. जागतिक बाजारात ते प्रति टन २,९९० डॉलर्सपर्यंत आहे. भारतात नारळ तेलाच्या आयातीवर १००% पेक्षा जास्त शुल्क आहे, ज्यामुळे ते महाग होतं. उद्योग संघटना सरकारकडे आयातीला परवानगी देण्याची मागणी करत आहेत.
इंटरनॅशनल कोकोनट कम्युनिटीचा (ICC) अंदाज आहे की या वर्षी देखील जागतिक बाजारात नारळ तेलाची किंमत २,५०० डॉलर्स ते २,७०० डॉलर्स प्रति टन दरम्यान राहील, जी २०२३ च्या १,००० डॉलर्सच्या जवळपास तिप्पट आहे. सिंगापूरमधील एका तेल व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार नवीन पिकांच्या आगमनामुळे येत्या काही महिन्यांत किमती थोड्या कमी होऊ शकतात, परंतु लवकरच ती २,००० डॉलर्सच्या खाली जाण्याची अपेक्षा नाही.
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
पुरवठ्याची तीव्र कमतरता
गोदरेज इंटरनॅशनलचे संचालक दोराब मिस्त्री यांच्या मते, नारळाची जुनी होत असलेली झाडं, लागवड कमी झाल्यामुळे आणि चांगल्या दर्जाच्या बियाण्यांचा अभाव असल्यानं उत्पादनात घट होत आहे. गेल्या तीन दशकांत नारळ तेलाचं जागतिक उत्पादन जवळजवळ स्थिर राहिलं आहे. "कधी दुष्काळ तर कधी पूर यामुळे उत्पादनावर सतत परिणाम होत आहे. कधी इंडोनेशियात दुष्काळ पडतो, तर कधी फिलीपिन्समध्ये वादळ पिकांचा नाश करतं," असं मलेशियाच्या लिनाको ग्रुपचे जो लिंग म्हणाले.