Anil Ambani CBI : अनेकांचे कोट्यवधी रुपये बुडवल्यानंतर आता उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांची कंपनी 'रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड' सीबीआयच्या कचाट्यात सापडली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाची सुमारे ३,७५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने बुधवारी अनिल अंबानी यांच्याविरोधात नवीन गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, एलआयसीच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आलेला हा चौथा मोठा खटला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, हे प्रकरण २००९ ते २०१२ या काळातील आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सने एलआयसीला ४,५०० कोटी रुपयांचे 'नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स' खरेदी करण्यासाठी प्रवृत्त केले होते. कंपनीच्या व्यवस्थापनाने आपली आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम असल्याचे आणि गुंतवणुकीला पूर्ण सुरक्षा कवच असल्याचे खोटे दावे केले होते, असा आरोप सीबीआयने केला आहे. एलआयसीने या दाव्यांवर विश्वास ठेवून गुंतवणूक केली, मात्र नंतर कंपनीची आर्थिक स्थिती खालावल्याने एलआयसीला ३,७५० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा मोठा आर्थिक फटका बसला.
कलमे आणि कायदेशीर कारवाई
या प्रकरणात सीबीआयने केवळ फसवणूकच नाही, तर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोपही लावले आहेत.
- गुन्हेगारी कट : कंपनीने जाणीवपूर्वक कट रचून एलआयसीला गुंतवणुकीसाठी भाग पाडले.
- फसवणूक : चुकीची आकडेवारी सादर करून गुंतवणूकदारांची दिशाभूल केली.
- भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा : या प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा - सोनं खरेदी करताय? जाणून घ्या तुमच्या दागिन्यांवरील 'मेकिंग चार्जेस'चे गुपित; सराफ किती कमावतात नफा?
रिलायन्स कम्युनिकेशन्सची सद्यस्थिती
एकेकाळी टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज असलेली ही कंपनी सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. अनिल अंबानी यांच्या विविध कंपन्यांवरील कर्जाचा डोंगर आणि कायदेशीर लढाईमुळे त्यांच्या व्यावसायिक साम्राज्याला मोठे ग्रहण लागले आहे. आता सीबीआयच्या या नव्या कारवाईमुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
