फरार उद्योगपती विजय मल्ल्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी तो एका पॉडकास्टमुळे चर्चेत आलाय. या पॉडकास्टमध्ये त्याने किंगफिशर एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांची माफीही मागितली आहे. त्याचबरोबर भारताबाहेर राहण्याच्या कारणाचाही त्यानं बचाव केलाय. या पॉडकास्टमध्ये विजय मल्ल्यानं आपण चोर नसल्याचं म्हटलं. राज शमानी याच्या पॉडकास्टमध्ये विजय मल्ल्यानं अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं.
किंगफिशरच्या कर्माचाऱ्यांची माफी
"किंगफिशर एअरलाईन्सच्या अपयशाबद्दल मी माफी मागतो. जे काही दाखवलं गेलं त्यापेक्ष परिस्थिती आणखी कठीण होती," असं विजय माल्ल्यानं पॉडकास्टमध्ये म्हटलं. दरम्यान, चर्चेदरम्यान त्यानं कोणताही गुन्हेगारी हेतू नव्हता असंही स्पष्ट केलं.
फरार म्हणा पण...
"जर जनतेला मला फरार म्हणायचं असेल तर तसे करा, पण मी पळून गेलेलो नाही. मी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आलो होतो. मी परतलो नाही हे खरं आहे, पण त्यासाठी माझी स्वतःची कारणं आहेत जी मी योग्य मानतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला मला फरार म्हणायचं असेल तर तसं करा. पण चोर कुठून आलं? चोरी कुठे आहे?" असं विजय माल्ल्यानं आर्थिक अनियमिततेच्या आरोपांवर म्हटलं.
भारतात परतण्यावर काय म्हटलं?
देशातील अनेक बँका आणि एजन्सी विजय माल्ल्या भारतात येण्याची वाट पाहत आहेत. पण तो गेल्या अनेक वर्षांपासून देशाबाहेर आहे. भारतात परतण्यावरही त्यानं वक्तव्य केलं. "जर मला निष्पक्ष खटला आणि सन्मानासह जीवन जगू देण्याचं आश्वासन मिळालं तर मी भारतात येण्याचा गांभीर्यानं विचार करेन," असं त्यानं स्पष्ट केलं.
२०१६ पासून युकेमध्ये
विजय माल्ल्यावर किंगफिशर एअरलाइन्सला दिलेले ९००० कोटी रुपयांचे कर्ज परत न केल्याचा आरोप आहे. मल्ल्या २०१६ पासून देशाबाहेर आहे. अनेक भारतीय बँकांनी एकत्रितपणे ही रक्कम किंगफिशरला दिली होती. सतत्यानं मिळत असलेल्या कायदेशीर झटक्यांनंतरही विजय माल्ल्या मीडिया ट्रायल आणि भारतात अन्यायकारक वागणूक दिल्याचा हवाला देत देशात परतण्यास विरोध करत आहे.