Byju Raveendran: एकेकाळी जगातील सर्वात मोठी एडटेक कंपनी असलेली बायजूस आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. दरम्यान, कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर स्वतःचा एक जुना फोटो शेअर करत एक प्रेरणादायी कॅप्शन लिहिलंय. "आम्ही खचलेलो नाही, पुन्हा उभे राहू," असं ते म्हणालेत. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी बायजूच्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे संकेत दिलेत.
कोरोना महासाथीच्या काळात जेव्हा शाळा बंद होत्या, तेव्हा ऑनलाइन शिक्षणाची मागणी वाढली आणि बायजूचा व्यवसाय झपाट्यानं वाढला होता.
RBI एप्रिलमध्ये पुन्हा व्याजदर कपात करू शकते, ६% वर येऊ शकतात दर; दिग्गज परदेशी बँकेची भविष्यवाणी
बायजूच्या संकटाची सुरुवात कशी झाली?
२०२२ पर्यंत बायजूसचं मूल्यांकन २२ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचलं होतं, परंतु शाळा आणि कोचिंग सेंटर पुन्हा सुरू झाल्यानं कंपनीच्या महसुलात घट होऊ लागली. असं असूनही बायजूसनं इतर अनेक कंपन्यांचं अधिग्रहण केल्यानं आर्थिक संकटात भर पडली. २०२३ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) बायजूजविरुद्ध १९ दशलक्ष डॉलर्सची थकबाकीबद्दल दिवाळखोरीची कारवाई सुरू करण्याचं अपील केलं होतं. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये तडजोड झाली आणि बायजूंनी संपूर्ण रक्कम देण्याचं मान्य केलं.
Broke, not Broken. We will rise again. pic.twitter.com/dAekepwCtf
— Byju Raveendran (@ByjuofBYJUS) March 30, 2025
संगनमताचा आरोप
त्यानंतर ग्लास ट्रस्टनं सर्वोच्च न्यायालयात आरोप केला की, बायजूसनं बीसीसीआयची थकबाकी फेडण्यासाठी कर्जदारांना परत करावयाचे पैसे वापरले. कंपनीनं गैरव्यवस्थापनाचे आरोप फेटाळून लावले, परंतु सर्वोच्च न्यायालयानं दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. लिंक्डइनवरील पोस्टमध्ये बायजू रवींद्रन यांनी, आपल्याला चुकीच्या पद्धतीनं यात ओढलं जात आहे आणि काही लोक या परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचं म्हटलं. ग्लास ट्रस्ट, ईवाय (कन्सल्टन्सी फर्म) आणि माजी सोल्युशन प्रोफेशनल पंकज श्रीवास्तव यांच्या संगनमताचा आरोप करत त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.