Share Market 2026 Falls: वर्ष २०२६ हे भारतीय शेअर बाजारासाठी आतापर्यंत कमालीचं चढ-उताराचं ठरले आहे. जागतिक अनिश्चितता, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि वाढता भू-राजकीय तणाव यामुळे बाजार वेगानं कोसळला आहे. याचा परिणाम म्हणून भारतीय शेअर बाजाराचे एकूण बाजार भांडवल (Market Cap) सुमारे ५३३ अब्ज डॉलरनं (साधारण ₹४९ लाख कोटी) कमी झालंय. गेल्या १५ वर्षांतील ही सर्वात मोठी घसरण मानली जातेय.
सध्या भारतीय शेअर बाजाराचे एकूण मार्केट कॅप सुमारे ४.७७ ट्रिलियन डॉलर राहिलंय, जे एप्रिल २०२५ नंतरची नीचांकी पातळी आहे. वर्षाच्या सुरुवातीला हे भांडवल ५.३ ट्रिलियन डॉलर होतं, म्हणजेच काही महिन्यांतच बाजाराच्या एकूण मूल्यामध्ये १० टक्क्यांची घट झाली आहे. याआधी २०११ मध्ये वर्षभरात भारतीय बाजारातून ६२५ अब्ज डॉलरचे मार्केट कॅप कमी झालं होतं.
फक्त एकाच मार्गामुळे जगाची अर्थव्यवस्था कोलमडू शकते का? कोण-कोणत्या आहेत हार्मुजसारख्या 'लाईफलाईन्स'
अनेक देशांच्या एकूण बाजार मूल्यापेक्षा मोठं नुकसान
विशेष म्हणजे, भारतीय बाजारातून जेवढे मार्केट कॅप कमी झाले आहे, ते अनेक देशांच्या संपूर्ण शेअर बाजाराच्या आकारापेक्षाही मोठे आहे. उदाहरणार्थ, ही घसरण मेक्सिको, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, नॉर्वे, फिनलंड, व्हिएतनाम आणि पोलंड यांसारख्या देशांच्या एकूण बाजार मूल्यापेक्षा जास्त आहे.
घसरणीची प्रमुख कारणं
मार्केट तज्ज्ञांच्या मते, या मोठ्या घसरणीमागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत:
परदेशी गुंतवणूकदारांची विक्री: वर्षाच्या सुरुवातीपासूनच परदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्यानं विक्री होत आहे.
कंपन्यांची सुस्त कामगिरी: अनेक कंपन्यांच्या उत्पन्नात अपेक्षेप्रमाणे वाढ न झाल्यानं गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला आहे.
जागतिक तणाव: अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाढता संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ ही चिंतेची बाब ठरली आहे. कच्च्या तेलाचा दर १०० डॉलर प्रति बॅरलच्या पार गेल्यामुळे भारताचे आयात बिल आणि महागाईचा दबाव वाढण्याची शक्यता आहे.
प्रमुख निर्देशांकांची स्थिती
२०२६ मध्ये आतापर्यंत सेन्सेक्स सुमारे १०.८ टक्क्यांनी तर निफ्टी सुमारे ९.५ टक्क्यांनी घसरला आहे. यासोबतच मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही मोठी कमकुवतपणा दिसून आलाय.
गुंतवणूकदारांसाठी सल्ला
सध्याची घसरण गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय असली, तरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही एक संधी ठरू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अशा काळात घाबरून निर्णय घेण्याऐवजी, मजबूत कंपन्यांमध्ये दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करणं अधिक फायदेशीर ठरू शकतं.
