पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे भारतात एक परिचित नाव बनलं आहे. भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या नावाची बरीच चर्चा सुरू आहे. परंतु, लष्करी बाबींव्यतिरिक्त मुनीर आणखी एका मोठ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत. पाकिस्तानी सैन्याने चालवलेल्या बलाढ्य व्यापारी साम्राज्याचं हे प्रकरण आहे. पाकिस्तानी लष्कराचं वर्णन देशातील सर्वात मोठा व्यापारी गट म्हणून केलं जातं. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान लष्कर १०० हून अधिक कंपन्या चालवते. यातील अनेक कंपन्या प्रचंड नफा कमावतात. या व्यवसायातून केवळ संस्थेलाच नव्हे, तर लष्करप्रमुखांसारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही मोठं उत्पन्न मिळतं. पाकिस्तानात लष्करप्रमुख होणं हे केवळ लष्करी काम नाही. ते एखाद्या महाकाय कॉर्पोरेटचे सीईओ होण्यासारखं आहे.
रिअल इस्टेट मार्केटवर पाकिस्तानी लष्कराचे मोठे नियंत्रण आहे. फौजी फाऊंडेशन, आर्मी वेल्फेअर ट्रस्ट, शाहीन फाऊंडेशन, बहरिया फाऊंडेशन अशा अनेक मोठ्या संस्था लष्कर चालवते. मात्र, त्यांना कल्याणकारी संस्था असं म्हणतात. परंतु, ते बिझनेस कॉर्पोरेशनप्रमाणे काम करतात. प्रसिद्ध पाकिस्तानी लेखिका आयेशा सिद्दिका यांनी आपल्या 'मिलिटरी इंक : इनसाइड पाकिस्तान्स मिलिटरी इकॉनॉमी' या पुस्तकात लष्कराची व्यावसायिक मुळं किती खोल आहेत हे स्पष्ट केलं आहे.
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
सिमेंटपासून डेअरीपर्यंत अनेक क्षेत्रांत सहभाग
सिमेंट आणि बँकिंगपासून ते डेअरी, वाहतूक आणि विशेषत: रिअल इस्टेटपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये लष्कराचा सहभाग आहे. कराची, लाहोर आणि इस्लामाबाद सारख्या शहरांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली घेतलेल्या जमिनींचं रूपांतर फायदेशीर गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये करण्यात आलं आहे. डिफेन्स हाऊसिंग ऑथॉरिटी (डीएचए) हा लष्कराद्वारे चालविल्या जाणाऱ्या सर्वात प्रसिद्ध रिअल इस्टेट ब्रँडपैकी एक आहे. त्याची किंमत अब्जावधी डॉलर्समध्ये आहे.
मुनीर यांची नेटवर्थ किती?
एका अंदाजानुसार, आज लष्करी व्यवसायांचं एकूण मूल्य ४० ते १०० अब्ज अमेरिकन डॉलरच्या दरम्यान असू शकतं. जनरल असीम मुनीर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांची एकूण संपत्ती सुमारे ८,००,००० अमेरिकन डॉलर (६.७ कोटी रुपये) आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. हल्ल्यापूर्वी मुनीर यांनी काश्मीरबाबत प्रक्षोभक भाषणं केली होती. यानंतर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध लोक मारले गेले होते. भारतीय लष्कराने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत बदला घेतला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्करानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करून अचूक हल्ले केले.