भारत देश लवकरच ऊर्जा आयात करणारा नाही, तर उर्जा निर्यात करणारा देश बनेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. सरकार इथेनॉल, बायोडिझेल, इलेक्ट्रिक वाहने आणि हायड्रोजन सारख्या पर्यायी इंधनांना प्रोत्साहन देत आहे. यामुळे प्रदूषण कमी होईल आणि वस्तूंच्या वाहतुकीचा खर्चही कमी होईल. याशिवाय, नवीन रस्ते बांधणे आणि इंधन बदलणे यामुळे लॉजिस्टिक्स खर्चही कमी होईल, असे गडकरी यांनी म्हटले आहे.
सध्या, भारत आपल्याला आवश्यक असलेल्या उर्जेचा मोठा भाग आयात करतो. यात प्रामुख्याने कच्चे तेल (पेट्रोलियम) आणि गॅसचा समावेश आहे. यामुळे देशावर मोठा आर्थिक भार पडतो. महत्वाचे म्हणजे, यासाठी भारत अनेक देशांवर अवलंबून आहे. यात अमेरिका, रशिया, इराक, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई), यांचा समावेश आहे.
हायड्रोजन भविष्यातील इंधन -
एका मुलाखतीत ऊर्जा या विषयावर बोलताना गडकरी म्हणाले, हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे. सरकार पर्यायी इंधनावर भर देत आहे. याचा देशाला फायदा होईल. आज आपला देश ऊर्जेची आयात करतो, मात्र, लवकरच ऊर्जेची निर्यात करणारा देश बनेल.
लॉजिस्टिक्स खर्च कमी होईल -
गडकरी म्हणाले, 'नवीन रस्ते बांधून आणि इंधन बदलून, आपला लॉजिस्टिक्स खर्च एक अंकी म्हणजेच ९ टक्क्यांपर्यंत कमी होईल आणि या वर्षाच्या अखेरपर्यंत हे होईल. तसेच, एका सर्वेक्षणानुसार, भारताची लॉजिस्टिक कॉस्ट 6 टक्क्यांनी कमी झाली आहे. यामुळे आता वस्तूंच्या वाहतुकीचा खर्च आता कमी झाला आहे, असेही गडकरी म्हणाले.