Mutual Fund Investment : म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्यांना नेहमीच जलद श्रीमंत होण्याचा 'जादुई फॉर्म्युला' हवा असतो. तुम्ही देखील असाच विचार करत असाल तर असा जादुई फॉर्म्युला नसाल तरी एक सूत्र नक्कीच आहे. ज्याद्वारे तुम्ही इच्छित लक्ष्य साध्य करू शकता. एका आर्थिक तज्ज्ञांने, गुंतवणुकीसाठी '१०-७-१०' चे सूत्र सांगितले आहे.
पर्सनल फायनान्स तज्ज्ञ रितेश सभरवाल यांनी लिंक्डइनवर हा '१०-७-१०' चा सोपा नियम सांगितला आहे. त्यांच्या मते, यशस्वी गुंतवणूक ही बाजाराचा अंदाज लावण्यापेक्षा तुमच्या वर्तनावर अधिक अवलंबून असते.
१. (पहिले १०) दरवर्षी १०% घसरणीसाठी तयार रहा!
या नियमाचा पहिला भाग गुंतवणूकदारांना बाजारातील अस्थिरता स्वीकारायला शिकवतो. सभरवाल म्हणतात की, "तुमच्या गुंतवणुकीत दरवर्षी १०% घसरण होईल, अशी अपेक्षा ठेवा." बाजारात तात्पुरती घसरण होणे ही कोणतीही असामान्य घटना नाही, तर ते सामान्य आहे. गेल्या २३ वर्षांत, भारतीय बाजारांनी २० वर्षांत किमान एकदा तरी १०% ची घसरण अनुभवली आहे. दीर्घकाळात संपत्ती निर्माण करणाऱ्या प्रत्येकाने दोन गोष्टी सहन करण्याची क्षमता ठेवली पाहिजे. वेळ आणि अल्प-मुदतीतील चढ-उतार.
२. (सात) ७ वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक कायम ठेवा!
या नियमातील '७' हा अंक संयमाचे महत्त्व अधोरेखित करतो. "तुमची SIP गुंतवणूक किमान ७ वर्षांपेक्षा जास्त काळ चालू ठेवा," असे सभरवाल सांगतात. मागील बाजाराच्या आकडेवारीनुसार, जी गुंतवणूक किमान ७ वर्षे टिकवून ठेवली जाते, त्याने नेहमीच सकारात्मक परतावा दिला आहे. गुंतवणुकीला वाढण्यासाठी पुरेसा वेळ दिला तरच चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. यामुळे बाजारातील घसरणीतून सावरण्यासाठी आणि एकूणच चांगला परतावा मिळवण्यासाठी वेळ मिळतो.
३. (दुसरे १०) दरवर्षी SIP मध्ये १०% वाढ करा!
या नियमातील शेवटचा '१०' हा आकडा गुंतवणूक दरवर्षी वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतो. जर तुम्ही दरमहा २०,००० रुपये १० वर्षांसाठी १२% परताव्यावर गुंतवले, तर ते अंदाजे ४६ लाख रुपये होतील. पण जर तुम्ही दरवर्षी SIP रकमेत १० टक्के वाढ केली, तर तीच गुंतवणूक सुमारे ६७ लाख रुपयांपर्यंत वाढू शकते! सभरवाल म्हणाले की, आर्थिक ताण न घेता, तुम्ही तुमच्या गरजेनुसार ५% जरी वाढ केली, तरी हे पुरेसे आहे. महत्त्वाचे म्हणजे गुंतवणुकीची रक्कम हळूहळू वाढवत राहणे.
वाचा - 'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
सभरवाल यांच्या मते, या नियमाचा उद्देश सर्वाधिक परतावा मिळवणे नाही, तर बाजाराच्या विविध चक्रात टिकून राहणारी सवय निर्माण करणे हा आहे. अल्प-मुदतीचे नुकसान अपेक्षित ठेवणे, दीर्घकाळ गुंतवणूक कायम ठेवणे आणि नियोजित पद्धतीने योगदान वाढवणे, हे बाजाराचा 'टाईम' करण्यापेक्षा अधिक चांगले काम करते. संपत्ती वाढवण्यासाठी एका परिपूर्ण धोरणाऐवजी एक वचनबद्ध धोरण आवश्यक आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
