SIP Investment :म्युच्युअल फंडामध्ये 'एसआयपी'द्वारे गुंतवणूक करणे आता सामान्य झाले आहे. शिस्तबद्ध गुंतवणूक आणि चक्रवाढ व्याजाचा फायदा यामुळे मोठा फंड तयार होतो, हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र, अनेक गुंतवणूकदारांची तक्रार असते की, सुरुवातीची काही वर्षे पैशांची वाढ संथ गतीने होते. मग प्रश्न पडतो की, एसआयपीमधील पैसा नेमका कधी वेगाने वाढू लागतो? निफ्टी ५० एसआयपीच्या गेल्या २५ वर्षांच्या कामगिरीचे विश्लेषण केल्यास याचे रंजक उत्तर मिळते.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
सुरुवातीची १ ते ३ वर्षे: संयमाची परीक्षा!
अनेक गुंतवणूकदार एसआयपी सुरू केल्यानंतर वर्ष-दोन वर्षातच परतावा पाहू लागतात, पण इथेच त्यांची निराशा होऊ शकते. २००० सालापासूनच्या आकडेवारीनुसार, १ ते ३ वर्षांच्या कालावधीत एसआयपीचा परतावा अनेकदा उणे राहिला आहे. काही कालावधीत एका वर्षाचा परतावा उणे ६५ टक्क्यांपर्यंत, दोन वर्षांचा उणे ४० टक्के आणि तीन वर्षांचा उणे २२ टक्क्यांपर्यंत खाली घसरला होता. शेअर्सचा परतावा चक्राकार पद्धतीने चालतो. सुरुवातीच्या काळात बाजारातील घसरणीतून सावरण्यासाठी पोर्टफोलिओला पुरेसा वेळ मिळत नाही, त्यामुळे 'टाइमिंग रिस्क' जास्त असते.
५ ते ७ वर्षे: चित्र बदलू लागते
गुंतवणुकीचा कालावधी जसजसा वाढतो, तसतसे बाजारातील चढ-उतारांचे सावट कमी होऊ लागते. ५ वर्षांच्या कालावधीत बाजारात कितीही अस्थिरता असली, तरी परतावा साधारणपणे ५ ते १० टक्क्यांच्या दरम्यान स्थिर होतो. ७ वर्षांचा कालावधी पूर्ण होताना परतावा सकारात्मक होण्याची शक्यता दाट असते. या टप्प्यावर बाजारातील मोठ्या घसरणीचा परिणाम पुसला जाऊन चक्रवाढ व्याजाचा प्रभाव दिसू लागतो.
१० वर्षांनंतर: संपत्ती निर्मितीचा 'अंतिम टप्पा'
जेव्हा तुम्ही १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ एसआयपी सुरू ठेवता, तेव्हा गुंतवणुकीचे स्वरूप पूर्णपणे बदलते. १० वर्षांनंतर परतावा नकारात्मक राहण्याची शक्यता जवळपास शून्य होते आणि वार्षिक 'डबल डिजिट' परतावा मिळणे सामान्य होते. या टप्प्यावर मार्केट रिकव्हरीचा फायदा थेट तुमच्या पोर्टफोलिओला मिळतो. सुरुवातीच्या वर्षांतील गुंतवणूक आता 'फ्युचर ग्रोथ'साठी इंधन म्हणून काम करते.
वाचा - बाजारात घबराट, पण LIC ला 'आयटी'वर विश्वास! TCS-HCL मध्ये मोठी गुंतवणूक; 'या' क्षेत्रातून काढला पैसा
का अपयशी ठरतात एसआयपी?
अनेक गुंतवणूकदार २-३ वर्षांतच एसआयपी बंद करतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची 'अवास्तव अपेक्षा'. शॉर्ट टर्ममधील चढ-उतारामुळे गुंतवणूकदारांचा संयम सुटतो. मात्र, तज्ज्ञांच्या मते, "एसआयपी बंद करणे हीच सर्वात मोठी चूक आहे." बाजारातील घसरण म्हणजे अधिक युनिट्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी असते, ज्याचा फायदा ७-१० वर्षांनंतर मोठ्या फंडात रूपांतरित होतो.
