lokmat Supervote 2024
Lokmat Money >विमा > देशात ५१ कोटी लोकांकडे आरोग्यविमा! २०४७ पर्यंत सर्वांसाठी शक्य? ‘असा’ आहे मेगा प्लान, पाहा

देशात ५१ कोटी लोकांकडे आरोग्यविमा! २०४७ पर्यंत सर्वांसाठी शक्य? ‘असा’ आहे मेगा प्लान, पाहा

व्यक्ती आणि व्यवसायांना तो आकस्मिक धोक्यांपासून संरक्षण पुरवतो. जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून, भारताच्या विमा उद्योगाने गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रगती केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 04:03 PM2023-10-03T16:03:19+5:302023-10-03T16:04:43+5:30

व्यक्ती आणि व्यवसायांना तो आकस्मिक धोक्यांपासून संरक्षण पुरवतो. जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून, भारताच्या विमा उद्योगाने गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रगती केली आहे.

51 crore people have health insurance in the country Possible for all by 2047 what is the mega plan details | देशात ५१ कोटी लोकांकडे आरोग्यविमा! २०४७ पर्यंत सर्वांसाठी शक्य? ‘असा’ आहे मेगा प्लान, पाहा

देशात ५१ कोटी लोकांकडे आरोग्यविमा! २०४७ पर्यंत सर्वांसाठी शक्य? ‘असा’ आहे मेगा प्लान, पाहा

मयंक गुप्ता

भारतातील विमा क्षेत्र हा देशाच्या आर्थिक सौष्ठवाचा निर्णायक आधारस्तंभ आहे. व्यक्ती आणि व्यवसायांना तो आकस्मिक धोक्यांपासून संरक्षण पुरवतो. जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून, भारताच्या विमा उद्योगाने गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रगती केली आहे. आयआरडीएआयच्या (Insurance Regulatory & Development Authority of India अर्थात राष्ट्रीय विमा नियामक व विकास प्राधिकरण) २०२१ सालाच्या अहवालानुसार, २०१९-२०२० मध्ये ३.७६ टक्के असलेली विमा स्वीकृती २०२०-२०२१ मध्ये ४.२० टक्क्यांवर पोहोचली आहे. एकंदर वाढीचा दर ११.७० टक्के एवढा नोंदवला गेला आहे. मात्र, ही प्रगती होऊनही, भारताच्या लोकसंख्येचा मोठा भाग अद्यापही विमा संरक्षणाच्या दृष्टीने दुर्लक्षित आहे. ह्या लोकांना योग्य विमा संरक्षण पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. 

स्टॅटिस्टाने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये, भारतभरातील सुमारे ५१ कोटी ४० लाख लोकांना आरोग्य विमा योजनांचे संरक्षण होते. म्हणजेच एकूण लोकसंख्येपैकी केवळ ३७ टक्क्यांना आरोग्य विमा संरक्षण आहे. उर्वरित लोकसंख्येकडे विमा नाही. ही तफावत भरून काढण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज ह्यातून दिसून येते. तसेच सर्व प्रकारच्या सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील प्रत्येक नागरिकाच्या आर्थिक कल्याणासाठी उपलब्ध होण्याजोगे व अत्यावश्यक साधन म्हणून विमा काम करेल ह्याची खातरजमा करणेही गरजेचे आहे. 

देशातील विमा वितरण वाढवण्यासाठी उपलब्ध असलेल्या अनेक साधनांमध्ये, मी नवविमाधारक अर्थात न्यू-टू-इन्शुरन्स (एनटीआय) ही संकल्पना सुचवली आहे. समाजातील ह्यापूर्वी विमा उत्पादने उपलब्ध नसलेला भाग ओळखण्यात तसेच त्याचे वर्गीकरण करण्यात न्यू-टू-क्रेडिटप्रमाणेच एनटीआयही उपयुक्त ठरेल. व्यक्तींना आर्थिक सक्षमीकरणासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज भासते, त्याचप्रमाणे आकस्मिक धोक्यांपासून संरक्षणासाठी विम्याची गरज भासते. एनटीआर व्यक्तींना ओळख मिळणे आणि त्यांचा विम्याच्या कक्षेत समावेश करणे ह्यामध्ये, ‘सर्वांसाठी विमा’ ह्या आयआरडीएआयच्या महत्त्वपूर्ण उद्दिष्टाच्या पूर्ततेला चालना देण्याची,  क्षमता आहे. ह्या दुर्लक्षित समूहाला लक्ष्य केल्यास विमा कंपन्यांना सर्वसमावेशक विमा व्याप्ती साध्य करता येईल तसेच देशाच्या दुर्गम भागापर्यंत विम्याचे संरक्षक छत्र विस्तारता येईल. 

न्यू-टू-इन्शुरन्स (एनटीआय) सक्षमीकरणासाठी चौकट

एनटीआय सक्षमीकरणाच्या प्रवासातील लाभार्थींमध्ये विस्तृत श्रेणींतील व्यक्तींचा समावेश होतो. विम्याची उपलब्धता जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचल्याचा लाभ ह्या व्यक्तींना होतो. लाभार्थींचे पुढे दिलेले प्रवर्ग ओळखण्याचे व त्यांना सामावून घेण्याचे उद्दिष्ट ह्या चौकटीमागे आहे. ह्या प्रत्येक प्रवर्गातून एनटीआय सक्षमीकरणाचे अनन्यसाधारण आयाम दिसून येतात:

●    मिलेनिअल्स आणि जेन झेड्सचे सक्षमीकरण: ह्या प्रवर्गात वेतनदार वर्गाच्या पलीकडे जाणाऱ्या तरुण व्यावसायिकांचा समावेश होतो. मुक्त व्यवसाय (फ्री लान्स) करणारे व्यावसायिक, गिग (पूर्णवेळ व्यावसायिकांऐवजी अर्धवेळ, मुक्त, कंत्राटी व्यावसायिकांवर चालणाऱ्या) अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक ह्यांच्यापासून ते उगवत्या उद्योजकांपर्यंत सर्वांचा ह्यात समावेश होतो. ह्या गतीशील लोकसंख्या वर्गापर्यंत विमा उत्पादनांचा विस्तार करून आपण त्यांना सुरक्षितता साधनांनी सुसज्ज करू शकतो. त्यातून त्यांच्या व्यवसायांनाही आधार मिळतो आणि आर्थिक जबाबदारीच्या संस्कृतीचीही जोपासना केली जाते.
●    ग्रामीण भागातील सक्षम करणारे घटक (एनेबलर्स) आणि अध्यापक: ग्रामीण विकासाच्या उपक्रमांमध्ये सहभागी होणारे तरुण शेतकरी, शिक्षक व तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा ह्या प्रवर्गात समावेश होतो. ह्या व्यक्ती ग्रामीण भागाच्या विकासासाठी अत्यावश्यक असतात पण विमा व्याप्तीमध्ये सहसा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यांचे सक्षमीकरण झाल्यास आर्थिक सुरक्षिततेमध्ये सुधारणा होऊ शकेल आणि पुढे ग्रामीण समुदायांच्या शाश्वत वाढीसही हातभार लागेल.
●    सूक्ष्म उद्योजक व स्वयंरोजगारित व्यक्ती: छोटे व्यावसायिक, कारागीर आणि सूक्ष्म उद्योजकांचा ह्या प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. ह्या उद्यमशील व्यक्ती अर्थव्यवस्थेत लक्षणीय योगदान देतात पण अनुकूल विमा पर्यायांच्या पुरेशा उपलब्धतेअभावी त्यांना विमा संरक्षण मिळू शकत नाही. त्यांचे सक्षमीकरण झाल्यास आर्थिक वाढीला चालना मिळू शकेल आणि त्यांच्या व्यक्तिगत कल्याणाचीही खातरजमा होऊ शकेल.
●    विद्यार्थी आणि महत्त्वाकांक्षी व्यावसायिक: ह्या प्रवर्गाला प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच विम्याची ओळख करून देण्यात आली, तर त्यांना आर्थिक नियोजन व स्थितीस्थापकत्वाची संस्कृती सुरुवातीपासूनच जोपासता येईल आणि सुरक्षित भविष्यकाळासाठी पार्श्वभूमी तयार होईल.
●    अनौपचारिक क्षेत्रातील कामगार: भारताच्या मनुष्यबळाचा मोठा भाग व्यापणाऱ्या अनौपचारिक क्षेत्राची दखल ह्या प्रवर्गाद्वारे घेण्यात आली आहे. कामगार, रोजंदारीवर काम करणारे व घरगुती मदतनिसांचे विमा संरक्षणाद्वारे सक्षमीकरण करणे ही त्यांची प्रतिष्ठा जपण्याच्या तसेच उपजीविका सुरक्षित करण्याच्या दृष्टीने  महत्त्वाची पायरी आहे. 
●    विमा संरक्षण नसलेल्या स्त्रिया: महिला उद्योजक, गृहिणी व व्यावसायिकांना न्याय्य पद्धतीने विमा सुविधा उपलब्ध करून देण्याचे महत्त्व हा प्रवर्ग अधोरेखित करतो. स्त्रियांना विमा संरक्षणात समान संधी देण्यास उत्तेजन देऊन, आपण समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये लिंगसमानता आणण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाशी संलग्नता राखतो. 

स्थितीस्थापक भवितव्यासाठी आव्हानांवर मात करणे
एनटीआय सक्षमीकरणाच्या प्रवासात आव्हाने अपरिहार्यच आहेत. सांस्कृतिक अडसर, जागरूकतेचा अभाव आणि विम्याचे हप्ते परवडतील की नाही ही चिंता हे महत्त्वाचे अडथळे आहेत. त्यामुळे धोरणात्मक उपायांद्वारे ह्या समस्यांवर मात करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सामुदायिक सहभाग कार्यक्रम, लक्ष्यीकृत जागरूकता अभियाने आणि हप्त्यांची नवोन्मेषकारी रचना ह्यांमुळे तफावत भरून काढण्यात तसेच विमा हा सर्वांसाठी व्यवहार्य पर्याय करण्यात मदत होऊ शकते. 

विम्यामधील जटीलतांचा अजिबात परिचय नसलेल्यांसाठी विमा समजून घेणे हे काहीसे घाबरवून टाकणारे असू शकते. खास विकसित करण्यात आलेले शैक्षणिक उपक्रम आणि वापरकर्त्यांसाठी सुलभ संवाद ही विमा सर्वांना समजावून देण्याची व एनटीआय ग्राहकांपर्यंत तो पोहोचवण्याची गुरूकिल्ली आहे. ह्यात, इन्शुअरटेक्सची भूमिका मार्गदर्शक ठरते. 

तंत्रज्ञान व नवोन्मेषाच्या माध्यमातून तफावत भरून काढणे
एनटीआय व्यक्तींना जाणवणाऱ्या अनन्यसाधारण आव्हानांवर मात करण्यात, इन्शुरटेक्सतंत्रज्ञान व डेटा ह्यांचा लाभ घेऊन, महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. उदाहरणार्थ, सर्वांच्या आवाक्यात असलेल्या मोबाइल अॅप्सद्वारे खास विकसित करण्यात आलेले शैक्षणिक कार्यक्रम पुरवून इन्शुअरटेक्स जटील संकल्पनांचे रूपांतर छोट्या, सर्वांना समजण्याजोग्या माहितीमध्ये करू शकतात. त्याचप्रमाणे हा नवोन्मेषकारी प्लॅटफॉर्म अंत:प्रेरणाधारित इंटरफेसेसना जन्म देतो. त्यातून पॉलिसींचे पर्याय खुले होतात आणि ग्राहकांना त्यांच्या स्वत:च्या गरजांनुसार निवड करता येते. विमा घेणे परवडण्याजोगे आहे का हा एनटीआय समूहापुढील आणखी एक चिंतेचा विषय आहे. अनुकूलित प्रक्रिया व  हप्त्यांची किफायतशीर मॉडेल्स ह्यांद्वारे ही चिंता दूर केली जाऊ शकते. शिवाय, एम्बेडेड इन्शुरन्ससारख्या संकल्पना विम्याचे रूपांतर दैनंदिन व्यवहारांमध्ये करू शकतात. त्यामुळे विमा घेणे विनाकटकट व सुलभ होते. अशा पद्धतीने इन्शुअरटेक्स, नवोन्मेषकारी, व्यक्तीनुरूप व परवडण्याजोग्या उपायांद्वारे विमा क्षेत्राला नवीन आकार देत आहेत. 

भविष्यकाळातील सहयोगात्मक मार्ग
एनटीआय सक्षमीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहे. सरकारी यंत्रणा, विमा कंपन्या आणि इन्शुअरटेक्स ह्यांनी प्रभावी धोरणे आखण्यासाठी व त्यांच्या अंमलबजावणीसाठी एकत्र येणे आवश्यक आहे. ह्या सहयोगांमुळे उपक्रमांचा प्रभाव खूप वाढू शकतो, व्याप्ती वाढू शकते आणि विमा उत्पादनांची स्वीकृती अधिक खोलवर पोहोचू शकते. 

न्यू-टू-इन्शुरन्स ग्राहकांचे सक्षमीकरण म्हणजे केवळ विमा उद्योगाचा विस्तार नव्हे; तर भारतभरातील आर्थिक स्थितीस्थापकत्वाची ती जोपासना आहे. विमा समजून घेण्यासाठी, निवडण्यासाठी तसेच त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक साधने व ज्ञान पुरवणे आवश्यक आहे, जेणेकरून, कोणत्याही पार्श्वभूमीतील व्यक्ती आयुष्याच्या असुरक्षिततांमधून आत्मविश्वासाने व सुरक्षितपणे मार्ग काढण्यास सक्षम आहे, अशा भविष्यकाळाच्या दिशेने, राष्ट्राचे मार्गक्रमण सुरू होईल. 


लेखक झॉपर इन्शुरन्स कंपनीचे सहसंस्थापक व सीओओ आहेत.

Web Title: 51 crore people have health insurance in the country Possible for all by 2047 what is the mega plan details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.