lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Budget 2021: पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प नको! जीडीपी महत्त्वाचा की पर्यावरण?

Budget 2021: पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प नको! जीडीपी महत्त्वाचा की पर्यावरण?

पालघर जिल्ह्याला पश्चिम घाटाच्या रांगा आणि सागरी भागात जैवविविधतेचे कोंदण लाभले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 12:12 AM2021-01-26T00:12:09+5:302021-01-26T07:11:47+5:30

पालघर जिल्ह्याला पश्चिम घाटाच्या रांगा आणि सागरी भागात जैवविविधतेचे कोंदण लाभले आहे

Budget 2021: No projects that harm the environment! GDP important or environment? | Budget 2021: पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प नको! जीडीपी महत्त्वाचा की पर्यावरण?

Budget 2021: पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प नको! जीडीपी महत्त्वाचा की पर्यावरण?

या पृथ्वीवर जगायचे असेल तर पैसा नावाचा कागद नाही, तर पर्यावरणीय परिसंस्था महत्त्वाच्या आहेत, ज्यांची किंमत अनमोल आहे. तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल असे म्हटले जाते, पर्यावरणाला असेच झुकते माप दिल्यास तो दिवस फार लांब नाही, जेव्हा आपणच एकमेकांना संपवून टाकू, असा इशारा पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला असून सरकारने पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प उभारू नयेत, अशी मागणी केली आहे.

पालघर जिल्ह्याला पश्चिम घाटाच्या रांगा आणि सागरी भागात जैवविविधतेचे कोंदण लाभले आहे. मात्र, वनस्पती व प्राणी-पक्ष्यांच्या नोंदी स्थानिक स्वराज्य संस्थांनी जैवविविधता नोंदवहीत करणे अत्यावश्यक आहे, परंतु त्या केल्या जात नसल्याने पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प माथी मारले जातात. - अनिकेत पाटील, कार्याध्यक्ष, वाढवण बंदरविरोधी कृती समिती

वनसंपदावाढीचा हेतू पर्यावरण की पर्यटन, हे आधी निश्चित केले पाहिजे. मोठा आर्थिक निधी आणि जीवापाड मेहनत करून हिरवाई निर्माण केली जाते. त्यानंतर, पर्यटनाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी होते, हे कुठेतरी थांबायला हवे. - उमेश चुरी, ताडबिया लागवड मोहिमेतील कार्यकर्ता, डहाणू

पालघर जिल्ह्याला ११० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र, अवैध रेती उपसा, नदी आणि खाडीच्या पात्रात भराव घातला जातो.  पर्यावरणात खाजण क्षेत्राचे अनन्यसाधारण महत्त्व असताना त्याची हानी होत आहे, याकडे सरकारने लक्ष द्यावे. - सचिन राऊत,  
तंटामुक्त समिती अध्यक्ष, नरपड

जीडीपी महत्त्वाचा की पर्यावरण? यामध्ये नेहमी भौतिक विकासाला झुकते माप दिले गेले. भूजल पातळी वाढवणारे डोंगर आणि जंगले, नद्या, समुद्र कायमचे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे. - प्रो. भूषण भोईर,  जैवविविधता अभ्यासक

पालघर जिल्हा पर्यावरण, खनिज संसाधनांचा मोठा साठा असलेला भूभाग असून जिल्ह्यात विकासात्मक प्रकल्प राबविले जाताना उपलब्ध संसाधनांचा उपलब्ध साठा नष्ट होणार नाही याची काळजी शासनाने घ्यायला हवी. पर्यावरण टिकून राहिले तरच मनुष्यप्राणी स्वास्थ्य टिकवून सुखाने जगू शकणार आहे. - प्रल्हाद ऊर्फ बाबा कदम,  सदस्य, पर्यावरण समिती

 

Web Title: Budget 2021: No projects that harm the environment! GDP important or environment?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.