Inflation : सोप्या भाषेत सांगायचे तर, महागाई म्हणजे तुमच्या पैशाची खरेदीशक्ती कमी होणे. पाच वर्षांपूर्वी १०० रुपयांत ५ किलो साखर येत होती, आज त्याच १०० रुपयांत केवळ ३ किलो साखर मिळते; याचाच अर्थ साखरेची किंमत वाढली असे नाही, तर तुमच्या १०० रुपयांचे मूल्य घटले आहे. जेव्हा संपूर्ण अर्थव्यवस्थेत वस्तू आणि सेवांचे दर व्यापक स्वरूपात वाढू लागतात, तेव्हा त्याला महागाई असे म्हटले जाते.
कशी मोजली जाते महागाई?
अर्थशास्त्रज्ञ वस्तू आणि सेवांची एक काल्पनिक 'बास्केट' तयार करतात आणि ठराविक काळानंतर त्यांच्या किमतींची तुलना करतात. यासाठी दोन प्रमुख निकष वापरले जातात.
- ग्राहक मूल्य सूचकांक : किरकोळ बाजारातील किमतींमधील बदल यात मोजले जातात. अन्नधान्य, कपडे, घरभाडे, इंधन, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजांचा यात समावेश असतो. हीच ती महागाई दर आहे, जी सर्वसामान्यांच्या खिशाला थेट चटके देते.
- घाऊक मूल्य सूचकांक : हा निर्देशांक कारखाने किंवा घाऊक व्यापाऱ्यांच्या स्तरावरील किमतींचा मागोवा घेतो. किरकोळ बाजारात वस्तू येण्यापूर्वीची ही स्थिती दर्शवतो.
महागाई वाढण्यामागे 'ही' ३ कारणे जबाबदार
- डिमांड-पुल इन्फ्लेशन (मागणी जास्त पुरवठा कमी): जेव्हा बाजारात वस्तूंचा पुरवठा कमी असतो आणि खरेदी करणारे लोक जास्त असतात, तेव्हा किमती वाढतात.
- कॉस्ट-पुश इन्फ्लेशन (खर्च वाढल्याने महागाई): जेव्हा कच्चा माल (उदा. कच्चे तेल किंवा कोळसा) महाग होतो, तेव्हा कंपन्या आपला तोटा भरून काढण्यासाठी उत्पादनांचे भाव वाढवतात. सध्याचे 'वेस्ट एशिया' संकट याच श्रेणीत येते.
- बिल्ट-इन इन्फ्लेशन (वेतन-किंमत चक्र) : किमती वाढल्या की कर्मचारी जास्त पगाराची मागणी करतात. पगार वाढला की उत्पादन खर्च वाढतो आणि परिणामी पुन्हा किमती वाढतात. हे चक्र सतत सुरू राहते.
महागाई : वरदान की अभिशाप?
हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी थोडी महागाई (साधारण २% ते ४%) गरजेची असते.
- महागाई केव्हा 'चांगली' असते?
- खर्चाला प्रोत्साहन : किमती हलक्या वाढत असतील, तर लोक खरेदी करण्यास उशीर करत नाहीत. यामुळे कारखाने सुरू राहतात आणि रोजगार मिळतो.
- विकासदर : सौम्य महागाई हे लक्षण आहे की बाजारात मागणी कायम आहे आणि अर्थव्यवस्था प्रगती करत आहे.
- कर्जदारांना फायदा : पैशाचे मूल्य कमी झाल्यामुळे जुने कर्ज फेडणे तुलनात्मकरीत्या सोपे होते.
वाचा - शत्रू राष्ट्रांच्या जहाजांना 'नो एन्ट्री'! इराणचा अमेरिकेला जशास तसे उत्तर; भारताचे काय होणार?
महागाई केव्हा 'वाईट' असते?
- बचतीचे नुकसान : जर बँकेत तुमच्या पैशावर ६% व्याज मिळत असेल आणि महागाई ८% असेल, तर तुमची बचत प्रत्यक्षात कमी होत आहे.
- निश्चित उत्पन्न गटावर मार : पेन्शनधारक आणि ठराविक पगार असलेल्या लोकांसाठी जीवन जगणे कठीण होते, कारण त्यांचे उत्पन्न वाढत नाही पण खर्च वाढतात.
- गुंतवणुकीत अनिश्चितता : महागाईचा दर खूप जास्त असेल, तर गुंतवणूकदार घाबरतात आणि नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणे टाळतात, ज्यामुळे विकास मंदावतो.
