Air India Plane Crash: १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या झालेल्या अपघातानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांच्या बुकिंगमध्ये २० टक्क्यांनी घट झाली आहे. इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सचे (आयएटीओ) अध्यक्ष रवी गोसाई यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. या काळात एअर इंडियाचे सरासरी भाडंही ८ ते १५ टक्क्यांनी कमी झालंय. याबाबत एअर इंडियाच्या प्रवक्त्याला विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचे एआय १७१ हे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच क्रॅश झालं होतं.
अनेकांचा मृत्यू
अहमदाबादमधील मेघानी नगर येथील मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर एअर इंडियाचं विमान धडकलं. या दुर्घटनेत विमानातील २४२ पैकी २४१ जणांसह एकूण २९७ जणांचा मृत्यू झाला असून त्यात वसतिगृहातील आणि आसपासच्या ५६ जणांचा यात समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय बुकिंमध्ये घट
या घटनेनंतर विशेषत: आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या बुकिंगमध्ये तात्पुरती घट झाली आहे. या घसरणीची नेमकी आकडेवारी मार्गानुसार वेगवेगळी असली, तरी आंतरराष्ट्रीय बुकिंगमध्ये १८ ते २२ टक्के आणि त्यानंतर देशांतर्गत १० ते १२ टक्क्यांनी घट झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, ही अल्पकालीन धारणा-आधारित प्रतिक्रिया असल्याचं दिसते, कारण गोष्टी सहसा काळानुसार बदलतात. ते म्हणाले की, येत्या काही दिवसांत हा ट्रेंड सामान्य होऊ शकतो कारण कोणतीही प्रणालीगत सुरक्षिततेची समस्या नोंदविली गेली नाही आणि डीजीसीएसारख्या प्राधिकरणांनी एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांचं पालन केल्याची पुष्टी केली.
तिकीट झालं स्वस्त
एअर इंडियाच्या प्रमुख मार्गांवरील भाड्यात किंचित बदल करण्यात आला आहे. देशांतर्गत तिकिटांचे दर सरासरी ८ ते १२ टक्क्यांनी कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय मार्गांवर, विशेषत: युरोप आणि आग्नेय आशियासारख्या ठिकाणांच्या भाड्यात १० ते १५ टक्क्यांनी घट झाली आहे, असं आयएटीओ अध्यक्षांनी सांगितलं. ट्रॅव्हल ऑपरेटर्सच्या माध्यमातून बुक केलेल्या एअर इंडियाच्या विमानांची तिकिटं लोकांनी रद्द केली आहेत का, असं विचारले असता आयएटीओ अध्यक्षांनी, आम्ही विशेषत: कॉर्पोरेट आणि उच्च दर्जाच्या हॉलिडे मेकर्सच्या रद्द होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, ज्यांनी पर्यायी मार्गांची निवड केली आहे, असं ते म्हणाले.