मराठवाड्यावर पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे संकट आहे. विभागातील जवळपास आठही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मागील महिन्यांत गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे २० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर पुन्हा अवकाळी पाऊस व गारपिटीचे संकट विभागावर आहे.
अवकाळीमुळे पुन्हा विभागातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. १९ एप्रिल ते २३ एप्रिलपर्यंत मराठवाड्याला हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. यात छत्रपती संभाजीनगरला १९ रोजी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. २० रोजी हलका पाऊस आणि गारपीट, २१ व २२ रोजी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची व २३ रोजी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
जालना, परभणी, बीड जिल्ह्यातही अशी परिस्थिती पुढील चार दिवसांत असणार आहे. हिंगोली जिल्ह्यात १९ ते २१ एप्रिलदरम्यान तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. २२ व २३ रोजी हलक्या पावसाच्या सरी व गारपीट होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
नांदेडमध्ये अशीच परिस्थिती असेल. लातूरमध्ये १९ ते २२ एप्रिलपर्यंत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. धाराशिव जिल्ह्याला १९ ते २३ एप्रिलपर्यंत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
