सागर कुटे
बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाचे काम सध्या प्रगतिपथावर असून, आगामी काळात सिंचनासाठी जलवाहिन्या टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाअंतर्गत शेती सिंचनासाठी इस्रायलच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, या अत्याधुनिक प्रणालीचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग ठरणार आहे.
विविध टप्प्यांतील कामांमुळे जिगाव प्रकल्पाचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. शेगावनजीकच्या मनसगाव येथे क्रमांक ७ ची उपसा सिंचन योजना पूर्ण झाली असून, ती आता कार्यान्वित करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत स्वयंचलित, दाबयुक्त व बंदिस्त नलिका वितरण प्रणाली (पीडीएन) बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात २०२७ पर्यंत ६१ हजार २५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
त्यानुसार २०२४ मध्ये उपसा सिंचन योजनेची प्रायोगिक चाचणी यशस्वीरीत्या पार पडली होती. आता मनसगाव येथील उपसा सिंचन योजनेपर्यंत पाणी पोहोचविणे शक्य झाले आहे. सप्टेंबर २०२४ पासून नदीपात्रात साठविण्यात आलेल्या सुमारे ३० दशलक्ष घनमीटर पाण्याचा उपयोग करून जून २०२६ पर्यंत १० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
'ओएमएस' युनिट्स म्हणजे काय ?
• या संपूर्ण सिंचन व्यवस्थेत इस्रायलद्वारा विकसित अत्याधुनिक आउटलेट मॅनेजमेंट सिस्टम (ओएमएस) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण २८५० ओएमएस युनिट्स कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
• पंपगृहातून येणाऱ्या जलवाहिन्यांवर शेतकऱ्यांच्या बांधावर ही युनिट्स बसविण्यात येणार असून, त्यामधून प्रत्येक शेतकऱ्याला आवश्यकतेनुसार सिंचनासाठी पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळून जलवापर अधिक परिणामकारक होणार आहे.
९३२६ किमी पाइपचा होणार वापर
पहिल्या टप्प्यातील सिंचन व्यवस्थेसाठी एकूण ११ पंपगृहांची उभारणी प्रगतिपथावर आहे. पाणी वितरणासाठी पीडीएन प्रणालीत सुमारे २०२० किलोमीटर 'एचडीपीई' आणि ३०६ किलोमीटर 'एमएस' पाइपचा वापर करण्यात येणार आहे.
'ओएमएस' युनिट्सचा असा होणार उपयोग
• आउटलेट मॅनेजमेंट सिस्टम (ओएमएस) तंत्रज्ञान सौर ऊर्जेवर चालणार आहे. या युनिटच्या एका पाइपमधून तीन हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा होणार आहे. विशेष म्हणजे, पंपहाऊसमधून यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
• आतापर्यंत प्रकल्पातून पाणीपुरवठ्यासाठी पाटसऱ्यांचा वापर करण्यात येत होता. आता राज्यात प्रथमच जिगाव प्रकल्पात या तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेएवढे पाणी घेता येणार आहे.
जिगाव प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात सिंचन व्यवस्था प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पायरी पूर्ण झाली आहे. मनसगाव येथील उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्यामुळे बंदिस्त, दाबयुक्त नलिका वितरण प्रणालीद्वारे पाण्याचा कार्यक्षम वापर शक्य होणार आहे. इस्रायल तंत्रज्ञानावर आधारित 'ओएमएस' प्रणालीमुळे प्रत्येक शेतकऱ्याला नियोजित आणि नियंत्रित पाणीपुरवठा करता येणार आहे. - श्रीराम हजारे, अधीक्षक अभियंता, जिगाव प्रकल्प.
