जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातील जलसाठ्याची सद्यःस्थिती ११ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या अहवालानुसार जाहीर करण्यात आली. यात सध्या प्रकल्पाची पाणीपातळी ४२४.२७० मीटर असून, एकूण जलसाठा २३६.२५२ दशलक्ष घनमीटर आहे.
या प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ३४४.८०० दशलक्ष घनमीटर असून जिवंत साठा सध्या १३३.६५२ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ५५.१८ टक्के आहे. यामध्ये मागील वर्षीच्या ५०.२२ टक्क्यांच्या तुलनेत ५ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. मात्र प्रकल्पातील जलसाठ्यात १९.८२ टक्क्यांची घट झाली आहे.
पाणलोट क्षेत्रातील काही शेतकऱ्यांच्या संपादित न झालेल्या जमिनी पाण्यात जाऊ नयेत, यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांनी १०० टक्के भराव न करता दरवर्षीप्रमाणे सुमारे ७५ टक्केच साठा ठेवण्याचे निर्देश दिले होते.
सध्या डावा कालवा (LBC) व उजवा कालवा (RBC) यांद्वारे कोणताही विसर्ग सुरू नसल्याची माहिती प्रशासनाने दिली असून, सांडव्यातूनही पाणी सोडले नाही.
पर्जन्यमान ९७० मिमी
दररोज बाष्पीभवनामुळे ०.१० दशलक्ष घनमीटर पाणी घटते. बिगर सिंचनासाठी ०.०३१० दशलक्ष घनमीटर वापर होतो. आतापर्यंत पर्जन्यमान ९७० मिमी आहे.
पाणीसंकट टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात
• शेतकऱ्यांनीही प्रकल्पासाठी दिलेल्या जमिनीचा आदर राखत प्रशासनास जागरूक राहण्याचे आवाहन केले असून, जलसाठ्याचे योग्य व्यवस्थापन करून परतूर-मंठा तालुक्यात पाण्याची उपलब्धता कायम ठेवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
• या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाने सध्याच्या साठ्यावर लक्ष ठेवणे आणि भविष्यातील संकट टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. १ जून २०२५ पासून आतापर्यंत पर्जन्यमान ९७० मिमी नोंदवले, मागील वर्षीच्या ९३४ मिमीच्या तुलनेत थोडी वाढ दिसते.
सध्या परतूर-मंठा तालुक्यातील गावांना पाणीटंचाई भासणार नाही, असे प्रकल्पातील ५५ टक्के साठ्यामुळे दिसत आहे. मात्र, भविष्यात परभणी जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून पाणी सोडल्यास टंचाई भासू शकते. - मुंजा कोल्हे, प्रकल्प अधिकारी, सेलू.
यावर्षी परतूर व मंठा तालुक्यातील २१ गावांतील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी प्रकल्पासाठी दिल्या आहेत. त्यामुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांना भविष्यात पाणीटंचाई भासू नये, यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांनी जलसाठ्यावर काटेकोर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ शकते. - कपिल आकात, युवक जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शेतकरी पक्ष गट, जालना.
