जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यात वाढत्या उन्हामुळे निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने घटत असून, सध्या धरणात ३९.७७ टक्के जिवंत जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
३ मे रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, धरणातील पाणीसाठा समाधानकारक असला तरी उन्हामुळे पाण्याची पातळी हळूहळू कमी होत आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच दिवशी धरणात ३३.५३ टक्के साठा होता. यंदा त्यात सुमारे ६ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
सध्या धरणाची पाणीपातळी ४२३.४४० मीटर असून, एकूण जलसाठा १९८.९३० दशलक्ष घनमीटर आहे. धरणाची साठवण क्षमता ३४४.८०० दशलक्ष घनमीटर असली तरी त्यापैकी उपयुक्त (जिवंत) साठा ९६.३३० दशलक्ष घनमीटर इतकाच उपलब्ध आहे.
कालव्यांद्वारे सध्या कोणताही विसर्ग सुरू नसून डावा (एलबीसी) व उजवा (आरबीसी) कालवा शून्य क्युसेक्सवर आहेत.
दीड महिन्यात २१.४१ टक्के पाणीसाठा कमी
१२ मार्च रोजी प्रक्रल्पात ५५.१८ टक्के तर, ३ मे रोजी ३३.७७ टक्के जलसाठा आहे. दीड महिन्यात २१.४१ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे.
०.१० दशलक्ष घनमीटर पाण्याचे होते बाष्पीभवन
• मात्र, उन्हाळी आवर्तनासाठी उजव्या कालव्याद्वारे ०.०६० दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर नोंदविला. पिण्यासाठी व बिगरसिंचन कामांसाठी रोज सरासरी ०.०३१० दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर होत आहे.
• दरम्यान, तापमानामुळे जलाशयातून रोज अंदाजे ०.१० दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होते. यंदा चांगल्या पावसामुळे धरणात आतापर्यंत ५९५.३२८ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली होती.
आगामीकाळात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती
• सध्या धरणातून नदीपात्रात किंवा मुख्य कालव्यांतून मोठा विसर्ग सुरू नसला, तरी उपलब्ध साठा लक्षात घेता आगामी पावसाळ्यापर्यंत पिण्याचे पाणी व नियोजित सिंचनासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
• अन्यथा पुढील काही दिवसांत पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. अतिरिक्त साठ्यामुळे ४८१.५३० दशलक्ष घनमीटर पाणी सांडव्याद्वारे विसर्जित केले होते.
हेही वाचा : हिरवळीचे खते देतील साथ; शेतकरी राजांनो, यंदा शेती खर्चात करा मोठी कपात
