टेंभुर्णी: भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून ८ हजार ७३४, तर घोड धरणातून ४ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. बंडगार्डन येथून ३८ हजार ६०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
सध्या दौंड येथून १० हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत ३० हजार क्युसेक पुढे जाऊ शकतो. सध्या उजनी धरणाचीपाणीपातळी ६० टक्के झाली असून, उजनीत एकूण ९६ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.
खडकवासला धरणातून मुळा मुठा नदीपात्रात आठ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला असून, नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे, तर घोड धरणातून घोड नदीपत्रात चार हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे.
सध्या दौंड येथील विसर्गात सध्या घट झाली असली तरी खडकवासला व घोड विसर्गमुळे दौंड विसर्गात मोठी वाढ होणार आहे. यामुळे उजनी धरणाची वाटचाल शंभरीकडे सुरू झाली आहे.
उजनी धरणात ९६.४ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला असून, ३२.४० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. भीमा खोऱ्यातील खडकवासला, कासारसाई, वडिवळे, विसापूर, घोड ही धरणे ७५ टक्के पेक्षा जास्त भरली आहेत.
सध्या खडकवासला व घोड धरणातून विसर्ग सोडण्यात येत असून, उजनी धरण ७५ टक्के भरल्यानंतर विसर्ग भीमा नदीपत्रात सोडला जाऊ शकतो.
उजनीतून पाणी सोडणार?◼️ उजनी पाणलोट क्षेत्रातील भीमा खोऱ्यात पाऊस सुरू असून, उजनी धरण ७५ टक्के भरल्यानंतर दौंड येथील विसर्गाचा अंदाज घेऊन उजनीतून पाणी सोडावे लागणार आहे. वरील विसर्ग पाहता पुढील तीन ते चार दिवसांत ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.◼️ आषाढी वारी ६ जुलैला असल्याने १ जुलैपासून पंढरपूर भक्तांनी फुलून जाणार आहे. पावसाचा जोर राहिल्यास उजनीची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी भीमा नदीत पाणी सोडले जाऊ शकते. यामुळे यावर्षी पंढरपूर आषाढी वारीवर पुराचे संकट ओढवू शकते.
अधिक वाचा: आता सातबारा व इतर भूमी अभिलेख विभागाचे दाखले मिळणार थेट व्हॉटस ॲपवर