श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पात यंदा गत वर्षीपेक्षा २० टक्के जादा उपयुक्त पाणीसाठा आहे. या प्रकल्पातील सर्वाधिक जास्त पाणी साठवण क्षमता असलेले घोड नदीवरील डिंभे धरण ओव्हरफ्लो झाले आहे.
धरणातून ९ हजार ४०० क्युसेकने पाणी नदीत सोडण्यात येत आहे. कुकडी प्रकल्पात गेल्या वर्षी जुलै महिन्यात १३ हजार ६४९ एमसीएफटी म्हणजे ४६ पाणीसाठा होता.
यावर्षी १९ हजार ४७७ एमसीएफटी इतका म्हणजे ६६ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. यामध्ये येडगाव, घोड, डिंबे, वडज, चिल्हेवाडी, विसापूर ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.
माणिकडोह धरण ३ हजार ८८२ एमसीएफटी म्हणजे ३८ टक्के भरले आहे. पिंपळगाव जोगे धरण धरणात २ हजार १७१ एमसीएफटी पाणी म्हणजे ५६ टक्के भरले आहे.
घोड मागील महिन्यात ओव्हरफ्लो झाले आहे. विसापूर तलाव २५ वर्षात पहिल्यांदा पावसाच्या पाण्यावर ओव्हरफ्लो झाला आहे.
डिंभे-माणिकडोह बोगदा कधी पूर्ण होणार?
◼️ डिंभे धरण भरले, ही आनंदाची बाब आहे. मात्र, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नाही. त्यासाठी डिंभे-माणिकडोह हा बोगदा होणे काळाची गरज आहे.
◼️ जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डिंभे-माणिकडोह बोगद्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे.
◼️ या बोगद्यासाठी नव्याने सुधारित प्रकल्प विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, या आराखड्याला मंत्रिमंडळाची मान्यता कधी मिळणार, असा प्रश्न लाभक्षेत्रातील लोकांकडून विचारला जात आहे.
अधिक वाचा: ऑगस्ट महिन्यात कसा राहील पावसाचा अंदाज? कोणत्या आठवड्यात जास्त पाऊस?