टेंभुर्णी : सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी जीवनदायी ठरलेले उजनी धरण यंदाही मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मृत साठ्यात गेले आहे.
मंगळवारी (दि. ५ मे) सायंकाळी धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात येत ६३.६६ टीएमसी इतका मृत साठा शिल्लक राहिला आहे.
राज्य शासनाने ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी जपून वापरण्याच्या सूचना दिल्याने पुढील मान्सूनपर्यंत पाणीटंचाईचे सावट कायम राहणार आहे.
राज्यातील सर्वाधिक मृत साठ्यातील धरण म्हणून उजनी ओळखले जाते. सोलापूर शहरासाठी उजनी येथून समांतर जलवाहिनी चालू करण्यात आली होती.
यामुळे उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा मे अखेर पर्यंत टिकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र शेतकऱ्यांचा या आशा फोल ठरल्या आहेत.
दरवर्षी प्रमाणेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृत साठ्यात गेल्याने उजनी धरणाचे नियोजन नेमके चुकले कुठे? असा प्रश्न पडला आहे. गेल्या वर्षी उजनी १८ एप्रिल रोजी मृत साठ्यात गेले होते.
गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ दिवस उशिरा मृत साठ्यात गेले असले तरी, गेल्या वर्षी मे महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस व ऑक्टोबरपर्यंत पाऊस लांबल्याने उजनीतून रब्बी हंगामासाठी उशिरा पाणी सोडण्यात आले होते.
सहा वर्षातील आकडेवारी बघता ५ वेळा उजनी मेच्या पहिल्या आठवड्यात किंवा मेनंतर मृत साठ्यात गेलेले आहे.
उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात आलेला ६ हजार क्युसेक विसर्ग पुढील दोन तीन दिवसांत बंद होणार आहे. तर उजनी कालव्यातून सोडण्यात येत असलेले पाणी २५ मे पर्यंत सुरू राहणार आहे.
शंभर दिवसांत ५३.३४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. गेल्या वर्षी १५६ टीएमसी तर चालू वर्षी २०० पेक्षा जास्त टीएमसी अतिरिक्त पाणी उजनीतून सोडून द्यावे लागले होते.
सहा वर्षांत या दिवशी गेले धरण मायनसमध्ये.
◼️ ५ मे २०२६
◼️ १८ एप्रिल २०२५
◼️ २१ जानेवारी २०२४
◼️ ६ मे २०२३
◼️ ६ जून २०२२
◼️ १३ मे २०२१
◼️ १३ मे २०२०
चालू वर्षीची आकडेवारी
◼️ १८ एप्रिल २०२५ मृत साठ्यात
◼️ २७ मे २०२५ मृत साठ्यातून बाहेर
◼️ ९ ऑगस्ट २०२५ १०० टक्के
◼️ २७ जानेवारी २०२६ पासून उजनी उपयुक्त पाणी पातळी घटण्यास सुरुवात.
अधिक वाचा: पावसाचे निसर्ग संकेत; वाचा निसर्गातील कोणकोणते सजीव कसे देतात पाऊस येण्याचे संकेत?
