'धरण उशाला, कोरड घशाला' ही म्हण अक्षरशः खरी ठरण्याची वेळ पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील राख, कर्नलवाडी व परिसरातील नागरिकांवर आली आहे.
कायम दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या या दक्षिण-पूर्व भागात राख येथील ब्रिटिशकालीन तलावात सध्या सुमारे २० टक्के पाणीसाठा असतानाही खालच्या भागातील विहिरींनी तळ गाठल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
यावर्षी पूर्वमोसमी वळवाचा एकही पाऊस न झाल्याने तसेच उष्णतेचा तीव्र परिणाम झाल्याने राख, कर्नलवाडी, गुळुंचे व वाल्ह्याच्या पूर्वेकडील वाड्धा वस्त्यांवरील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पेरणीपूर्व मशागती पूर्ण करून शेतकरी आता आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.
गतवर्षी मे महिन्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. पावसाळ्यातही नियमित पाऊस झाल्याने राखचा तलाव व फांज ओढ्यावरील तलाव भरून वाहिले होते. परिणामी, खालच्या भागातील विहिरी तुडुंब भरल्या होत्या. मात्र यावर्षी परिस्थिती पूर्णता उलट असून, मार्च-एप्रिलमध्येच विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खाली गेली आहे.
राखच्या उत्तर व पूर्वेकडील डोंगररांगांतून येणारे पावसाचे पाणी पुणे-मिरज रेल्वे बंधारा, पाद्वार तलाव, फांज ओढा आणि ब्रिटिशकालीन तलावात साठते. मागील काही वर्षात तलावातील गाळ मोठ्या प्रमाणावर काढल्याने जलसाठा वाढला होता.
त्यामुळे माने वस्ती, रणवरेवाडी, कर्नलवाडी, झिरिप वस्ती व गुळुंचे परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढत असे. मात्र, यंदा तलावात पाणी असूनही विहिरी कोरड्चा पडल्याने भूजल व्यवस्थेतील बदलाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पूर्वी तळे भरले की विहिरी पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी देत असत. आता तळ्यात पाणी असूनही विहिरी कोरड्या पडत आहेत. याची गंभीर दखल घेऊन भूजल सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. - स्वप्नाली विराज निगडे, उपसरपंच, कर्नलवाडी.
उष्णतेचा परिणाम; पाणी झपाट्याने आटले
• यंदा पावसाचे प्रमाण चांगले असतानाही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ओढ्या-नाल्यांमध्ये पाणी होते. मात्र गेल्या दोन आठवड्यांत वाढलेल्या उष्णतेमुळे हे पाणी पूर्णतः आटले. याचा इतका तत्काळ परिणाम होईल, असा अंदाज शेतकऱ्यांना नव्हता.
• पूर्वी अशा परिस्थितीत विहिरी किमान महिनाभर तग धरायच्या; आता मात्र त्वरित कोरड्या पडल्याने पिके टिकवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
खाणींमुळे भूजलावर परिणाम ?
राख परिसरात तलावातील गाळ काढण्यासोबतच गावाच्या पूर्वेला दगडखाणींना परवानगी देण्यात आली. या खाणींमध्ये स्फोटकांचा वापर करून उत्खनन केले जात आहे. खाणींची वाढती खोली लक्षात घेता भूगर्भातील जलस्तरावर परिणाम झाला असावा, अशी शंका शेतकरी व्यक्त करत आहेत.
