महत्त्वपूर्ण मानली जाणारी नारपार-गिरणा नदीजोड योजना आता प्रत्यक्ष गतीकडे वाटचाल करत आहे. ही योजना जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यांसाठी जलसंजीवनी ठरणार असल्याचा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
जून २०२३ मध्ये या योजनेची घोषणा झाली होती. महायुती सरकारने या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी ४ हजार ११६ कोटींच्या कामाचा कार्यारंभ आदेश जारी केला आहे.
या योजनेमुळे जळगाव, धुळे व नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला फायदा होणार आहे. त्यामुळे या भागातील पाणी टंचाई दूर होणार आहे.
योजनेचे मुख्य फायदे असे...
• कृषी समृद्धी : या प्रकल्पांमुळे जळगाव, नाशिक व धुळे जिल्ह्यातील केळी, कांदा, द्राक्ष, कापूस या पिकांना स्थैर्य लाभणार
• जलस्तर वाढणार : भूजल पातळी वाढून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार
• आर्थिक स्थैर्य : ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळून शेतकऱ्यांचे स्थलांतर थांबणार
दुष्काळी भागांना मोठा दिलासा मिळणार
यामुळे चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, मालेगाव, देवळा आणि धुळे जिल्ह्यातील अनेक दुष्काळी भागांना मोठा दिलासा मिळणार आहे. नारपार-गिरणा योजना पूर्ण झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी अधिक सक्षम होईल आणि भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी ही योजना वरदान ठरेल, असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.
