'कुऱ्हा पानाचे' उपसा सिंचन योजना क्र. १ व २ ला राज्य शासनाने सुमारे २८१ कोटी रुपयांची तत्वतः मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली.
या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे तापी नदीचे पाणी उपसा करून सिंचनासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. याचा थेट लाभ कुऱ्हा पानाचे, शिंदी, खंडाळे आणि मोंढाळे या चार गावांतील ३७५६.८२ हेक्टर क्षेत्राला होणार असून, ही जमीन कायमस्वरूपी ओलिताखाली येणार आहे.
यामध्ये कुन्हा पानाचे (१६५० हे.), खंडाळे (४१२ हे.), मोंढाळे (८०५ हे.) व शिंदी (८८८ हे.) या क्षेत्रांचा समावेश आहे. या योजनेमुळे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांत शेती करणे शक्य होणार असून, दुष्काळी पट्टयातील शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाला आर्थिक मोठा आधार मिळणार आहे.
अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या योजनेला अखेर गती मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन योजना क्रमांक १ आणि क्रमांक २ यांना मिळालेली मान्यता ही भुसावळ मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी बाब आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या योजनेचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या योजनेमुळे दुष्काळी भागातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होईल. - संजय सावकारे, वस्त्रोद्योग मंत्री.
तापी नदीवरून होणार पाण्याचा उपसा
या योजनेसाठी तापी नदीतून पाण्याचा उपसा केला जाणार आहे. त्याचा फायदा परिसरातील शेतांना मिळेल.
