मुंबई : सलग दोन दिवस ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाने चटके दिल्यानंतर बुधवारी मुंबईचा पारा ३४ अंश नोंदविण्यात आला आणि मुंबईकरांना किंचित दिलासा मिळाला.
परंतु उष्ण आणि दमट हवामान कायम असतानाच तळपता सूर्य डोक्यावर आग ओकत असल्याने मुंबईकरांना बसणारे चटके कायम होते.
दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या अनेक भागांत पावसाची शक्यता मेघगर्जनेसह वर्तविण्यात आली आहे.
आता पुढील काही दिवस तापमान ३४ अंशावर स्थिर राहणार असले तरी हवामानातील हे बदल मुंबईकरांना तापदायकच ठरणार असल्याचे चित्र आहे.
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्राच्या आतील भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
यामध्ये सांगली, सातारासह सोलापूर जिल्हा आणि आसपासच्या परिसराचा समावेश आहे, तर पुढील दोन दिवस कोकणात उष्ण व दमट हवामान राहील.
अधिक वाचा: राज्यात 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२० च्या खरीप पीक विम्याचे पैसे मिळणार; शासन निर्णय जारी
