गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर असलेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकेल.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १२ ते १३ जूनपर्यंत महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या पाच ते सहा दिवसांत राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या अंदाजानुसार शनिवारी, ७ जून रोजी राज्यातील घाट भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल. ८ जूनला महाराष्ट्राच्या आतल्या भागात मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
या आठवड्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्यासाठी वातावरण अनुकूल असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
घाटमाथ्यावर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुणे, सातारा, सांगली या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहेत.
तर सोलापूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या कालावधीत ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील. उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान, पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, तर कोकण आणि विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा: सातबारा उताऱ्यांमधील चुकांच्या दुरुस्तीसाठी भूमिअभिलेख विभागाचा नवा निर्णय; जाणून घ्या सविस्तर