राजरत्न सिरसाट
बहुप्रतीक्षित नेरधामणा बॅरेजचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ पंपहाऊस आणि पाणी वितरण नलिकेचे काम पूर्ण होणे बाकी आहे. हे काम येत्या २०२७ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता असून, त्यानंतर शेतकऱ्यांना सिंचनासाठी बारमाही पाणी मिळणार असल्याचा विश्वास जलसंपदा विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे सिंचनासाठी बारमाही पाणी पुरवठा करणारा हा अकोला जिल्ह्यातील पहिला प्रकल्प ठरणार आहे.
नेरधामणा बॅरेजची एकूण साठवण क्षमता ८.१८ दलघमी आहे. यामधून खारपाणपट्ट्यातील ७ हजार २४ हेक्टर क्षेत्रावर सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या बॅरेजमधील उपलब्ध पाणी रब्बी पिकांसाठी वापरात आणले जाते. त्यानंतरही जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांपर्यंत पुनर्निर्मितीचा प्रवाह (रिजनरेशन फ्लो) या बॅरेजमध्ये सुरू राहतो.
त्यामुळे बॅरेजची साठवण क्षमता जरी ८.१८ दलघमी असली, तरी रिजनरेशन फ्लोमुळे प्रत्यक्षात २२ दलघमीपर्यंत पाणी उपलब्ध होते. हा साठा मे महिन्यापर्यंत वापरता येईल, असा अभ्यास जलसंपदा विभागाने केला असून, त्यादृष्टीने या धरणाच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या पाणी वितरण नलिका व पंपहाऊसचे काम पूर्ण व्हायचे असल्याने या बॅरेजमध्ये अपेक्षित साठा केला जात नाही. पंपहाऊस आणि वितरण नलिकेचे काम पूर्ण झाल्यावर पाणी साठा केला जाईल.
नेरधामणा बॅरेजमधून पाणी उपसले तरी पुनर्निमितीचा प्रवाह सुरू राहत असल्याने या बॅरेजची साठवण क्षमता ८.१८ दलघमी असली, तरी प्रत्यक्षात २२ दलघमी पाणी उपलब्ध होते. त्यामुळे दरवर्षी मे महिन्याच्या शेवटपर्यंत सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. २०२७मध्ये पाणी वितरण नलिका व पंपहाऊसचे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- चिन्मय वाकोडे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा, अकोला.
मुख्य अभियंत्याकडून कामाची पाहणी
• दरम्यान, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता जगत टाले यांनी बुधवारी ब बॅरेजला प्रत्यक्ष भेट देऊन कामांचा आढावा घेतला. यावेळी निर्गुणा मध्यम व विश्वमित्रा लघु प्रकल्पाचीही पाहणी करण्यात आली.
• इतर प्रकल्पांचाही आढावा घेत त्यांनी सर्व प्रकल्प व धरणांच्या मजबुतीकरणाबाबत तसेच सुरक्षेसंदर्भात आवश्यक सूचना केल्या. यावेळी जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता मेघा अक्केवार, कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे उपस्थित होते.
पाणी वितरण नलिका कधी होणार?
कालव्याऐवजी आता सिंचनासाठी पाणी वितरण नलिकांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी एकूण १६० किलोमीटर लांबीच्या पाणी वितरण नलिका आवश्यक असून, आतापर्यंत सुमारे २० किलोमीटरपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. तसेच पंपहाऊसचे काम करताना खारपाणपट्ट्यातील काळी माती अडसर ठरत असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा : कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारी परदेशी भाजीपाला शेती; जाणून घ्या सविस्तर
