Maharashtra Weather News : राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम राहणार आहे. तर हिमाचल प्रदेशात २३ डिसेंबरपर्यंत थंडीची लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीर या राज्यात २५ डिसेंबरपर्यंत थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट आली असून याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला आहे. तापमानात वाढ झाली असली तरी थंडीचा कडाका कायम आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात गारठा वाढला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, देशात वाहणाऱ्या थंड वाऱ्यांची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे मध्य भारतापर्यंत गारठा वाढला आहे. तर पूर्वोत्तर राज्यांमध्येही किमान तापमानात घट होऊन काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात गुरुवारी(१९ डिसेंबर) रोजी अहिल्यानगरचे तापमान सर्वात कमी होते. या ठिकाणी ७.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
नैऋत्य व लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर आज कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तर पुढील १२ तासांत ते उत्तर तामिळनाडू ते आंध्र प्रदेश किनारपट्टी लगत उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात चारही उपविभागात येत्या काही दिवसात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे व परिसरात पुढील २ दिवस आकाश निरभ्र राहून धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील ४ ते ५ दिवस राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहून सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात कोकण व रत्नागिरीतील तापमानात वाढ झाली आहे. तर राज्यात इतर जिल्ह्यात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. येत्या ४८ तासांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर हळू हळू थंडी कमी होणार आहे.
राज्यात परभणी, निफाड, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथेही थंडी वाढली आहे. विदर्भासुद्धा थंडीचा कडाका वाढला आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमान १० अंशांच्या खाली गेले आहे.
नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याची माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिली आहे. येत्या १२ तासांत हे चक्रीवादळ वायव्येकडे तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर २४ तासांत हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर उत्तरेकडे सरकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, पश्चिमी विक्षोभामुळे थंडीची स्थिती वाढू शकते. अनेक भागात थंड वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील काही दिवस डोंगराळ भागात जोरदार बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. पुर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचावा. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही. पहिल्या आणि दुसऱ्या वेचणीचा चांगला आणि कवडी कापूस वेगळा साठवावा.
* फुल पिकात खुरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.